नड्डांनी वगळलेले चेहरे ‘टीम मोदी’ मध्ये दिसणार? 

Narendra-Modi-and-JP-Nadda
Narendra-Modi-and-JP-Nadda

बिहार निवडणुकीच्या काळातच मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता
नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देताना अनेक अनुभवी नेत्यांना वगळण्यात आले. यातीलच काही नेत्यांना केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अनिल जैन, पी. मुरलीधर राव, सरोज पांडे, पूनम महाजन ही यातील आघाडीची नावे आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिहार निवडणुकीच्या आसपासच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करू शकतात. मागील वर्षी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केंद्रात सलग दुसऱ्या वेळेस घसघशीत बहुमताने केंद्रातील सत्ता मिळविल्यानंतर गृहमंत्रीपदी अमित शहा यांची निवड केली. त्यानंतर सत्तारूढ सर्वेसर्वा नेतृत्वाने शांत व सौम्य स्वभावाचे नड्डा यांच्याकडे पक्षाध्यक्षपपदाची जबाबदारी दिली. तथापि त्यानंतर ८ महिन्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक दिल्ली किंवा पाटणा येथे पुढील महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. 

नड्डा यांच्या टीममधून वगळलेल्या काही नेत्यांनी आपापल्या काळात उल्लेखनीय संघटनात्मक काम केल्याने त्यांना वगळल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत होते. यातील काहींना पक्षसंघटनेतील पदे दिल्याने त्यांच्याकडील आघाड्यांची जबाबदारी काढून घेतली आहे तर काहींकडून पक्षातील पदे काढल्यावर त्यांना दुसरी जबाबदारी दिलेली नाही हे सूचक मानले जाते. 

विजया रहाटकर यांनी जम्मू-काश्‍मीरपासून अनेक राज्यांत घट्ट केलेले महिला आघाडीचे जाळे, राम माधव यांचे ईशान्य भारतातील कार्यक्रम, पांडे यांनी अल्पावधीत महाराष्ट्राच्या पक्षसंघटनेशी साधलेला समन्वय, महाजन यांनी भाजप युवा मोर्चाची राज्याराज्यांत रूजवलेली पाळेमुळे, श्याम जाजू यांनी दिल्ली प्रदेश भाजपमधील भांडणे मिटविण्यासाठी केलेली धडपड यांची दिल्लीतही वारंवार चर्चा होत असे. त्यामुळे या सर्वांकडील संघटनात्मक पदे काढून घेतल्याचीही चर्चा ‘दीनदयाळ उपाध्याय मार्ग’ परिसरात सुरू झाली. त्यानंतर यातील काही नावे मोदी मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात दिसू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

आंध्र, केरळ, तेलंगणातील नवे चेहरे येणार
सध्या अनेक मंत्र्यांकडे दोन-तीन मंत्रालयांची जबाबदारी आहे. त्यांना त्यातून मुक्त करून नव्या चेहऱ्याकडे वाणिज्य-उद्योग, दूरसंचार, अवजड उद्योग किंवा सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्रालयांपैकी काहींची जबाबदारी दिली जाऊ शकते. बिहारपाठोपाठ पश्‍चिम  बंगालच्या निवडणुकीचे वारे सुरू होणार असल्याने त्या राज्यासह आंध्र प्रदेश, केरळ व तेलंगणातील नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्‍यता आहे

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com