कोरोना वाढल्याने यंत्रणेची धावपळ

Corona
Corona

महाराष्ट्र, पंजाबमध्ये केंद्राची पथके येणार; राज्यांना त्रिसूत्रीवर भर देण्याचे निर्देश
नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि पंजाबमधील कोरोनाचा संसर्ग वाढल्याने केंद्राने आता या दोन्ही राज्यांमध्ये तातडीने विशेष आरोग्य पथके  पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. ही पथके आज-उद्या रवाना होतील व संबंधित राज्य सरकारांच्या मदतीने संसर्गाची साथ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करतील. 

ही पथके केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला नियमित अहवाल देतील. या पथकात डॉक्‍टर व आरोग्य तज्ज्ञांसह भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) तज्ज्ञांचाही समावेश असेल. दरम्यान आज राज्यातील बाधितांमध्ये १० हजार १८७ जणांची भर पडली तर ४७ जणांचा मृत्यू झाला.

कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काळात राबविलेली चाचण्या घेणे, लक्ष ठेवणे आणि उपचार करणे ही त्रिसूत्री आक्रमकपणे राबवा असे निर्देश केंद्राने संबंधित राज्यांना दिले आहेत. आरोग्य पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविणे, चाचण्यांचा व लसीकरणाचा वेग वाढविणे, बेशिस्त नागरिकांवर कठोर कारवाई करणे याबाबतही हयगय न करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत.

महाष्ट्रासह काही राज्यांत कोरोनाची परिस्थिती पुन्हा भयावह होत चालली असून कालच्या एकाच दिवसात १० हजारांहून नवे रूग्ण आढळल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयात चिंतेचे वातावरण आहे. राज्यात १७ ऑक्‍टोबरनंतर एकाच दिवसात रुग्णसंख्येत झालेली ही पहिली मोठी वाढ आहे.

ब्रिटिश कोरोना धोकादायक
पंजाबमध्येही परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यामुळे जालंधरसह अनेक शहरांत रात्रीची संचारबंदी  लागू करण्यात आली आहे. विशेषतः ब्रिटनमधील नव्या विषाणूचे संक्रमण महाराष्ट्रासह काही राज्यांत वेगाने होत असल्याच्या वृत्ताने केंद्रीय यंत्रणा धास्तावली आहे. ब्रिटनमधून आलेला हा विषाणू झपाट्याने पसरतो व त्याचा परिणामही तेवढाच घातक ठरतो असे दिसून आले आहे. देशात नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्यांचा आकडा २४० वर पोचला आहे. 

१८० जिल्ह्यांत वाढ
देशातील १८० हून जास्त जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. वेगाने रुग्ण वाढणाऱ्या राज्यांत महाराष्ट्रातील सर्वाधिक ६, पंजाब ५, केरळ,गुजरातमधील प्रत्येकी चार व मध्यप्रदेशातील ३ जिल्ह्यांचा समावेश आहे. राजधानी दिल्लीत आज ३०० हून जास्त नवे रुग्ण आढळले. गेल्या एकाच आठवड्यात घरात विलगीकरणात राहणाऱ्यांची संख्या ३७ टक्‍क्‍यांनी वाढली असून प्रतिबंधित (कंटेन्मेंट) विभागांतही पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

  • १ कोटी ९४ लाख एकूण लसीकरण (दिवसाला १० हजार जणांना लसीकरण करणारा अमेरिकेनंतरचा दुसरा देश)
  • २२ कोटी ३ लाख चाचण्या झालेल्यांची संख्या

रेमडेसिव्हिरची किंमत होणार कमी
मुंबई - राज्यातील कोरोनावरील  उपचारासाठी लागणारी औषधे प्रामुख्याने रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, मेडिकल ऑक्‍सिजन आणि इतर औषधांच्या  उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग नियमित आढावा  घेत आहे. कोरोनावरील उपचारात प्रामुख्याने रेमडेसिव्हिरचे इंजेक्‍शन प्रभावी ठरत असल्याचे आढळून आले आहे. या इंजेक्शनच्या किमतीवर नियंत्रण आणण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. सध्या बाजारात सहा प्रमुख उत्पादकांचे रेमडेसिव्हिरचे १०० मिलिग्रॅंमचे इंजेक्‍शन उपलब्ध आहे. या सहा उत्पादकांच्या औषधाच्या किमतीची प्रशासनाने माहिती घेतली. यात वाढीव अधिकतम किरकोळ विक्री किमतीचा रुग्णांवर आर्थिक भुर्दंड पडतो. त्यामुळे नागरिकांत रोष आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आढावा घेत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची घाऊक विक्री किंमत आणि अधिकतम किरकोळ विक्री किंमत यातील  फरक कसा कमी करता येईल आणि रुग्णांना माफक दरात हे औषध कसे उपलब्ध होईल या अनुषंगाने अन्न  व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ६ मार्च रोजी मुंबई मुख्यालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीस औषध विक्रेते संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. या औषधाची अधिकतम किरकोळ विक्री किंमत कमी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com