नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तरुणाचे चिनी सैनिकांनी अपहरण केल्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. या तरुणाच्या मुक्ततेसाठी भारतीय लष्कराने चिनी सैनिकांशी संपर्क साधला आहे. मात्र, भाजप खासदाराने भारतीय हद्दीतून अपहरण झाल्याचा दावा केल्याने हे प्रकरण संवेदनशील झाले आहे.(India China face off again)
भाजपचे खासदार तापीर गाओ यांनी ट्विट करून या अपहरणाची माहिती उघड केली. चिनी सैनिकांनी मंगळवारी जिदो गावातील १७ वर्षीय तरुण मिराम तारोनचे भारतीय हद्दीतील लुंगटा जोर (ज्यात चीनने २०१८ मध्ये भारतीय हद्दीत तीन ते चार किलोमीटर आतमध्ये रस्ता बांधला आहे) ते सियुंगला या भागातील बिशिंग गावापर्यंतच्या क्षेत्रात अपहरण केले आहे. हा भाग अपर सियांग जिल्ह्यात येतो. या तरुणाचे मित्र चिनी सैनिकांच्या तावडीतून पळाले आणि त्यांनी या प्रकाराची माहिती अधिकाऱ्यांना दिली. केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणांनी या तरुणाच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, असे ट्विट केले. तसेच, तापीर गाओ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथसिंह, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चाउना मीन तसेच भारतीय लष्करालाही तरुणाच्या मुक्ततेसाठी आवाहन केले.
गेल्या काही काळापासून भारत-चीन सीमेवर तणाव वाढल्यानंतर चीनच्या कुरापतीही वाढल्या आहेत. अरुणाचल प्रदेशावर दावा सांगताना या क्षेत्रातील भौगोलिक स्थळांची चिनी भाषेतील नावे जाहीर करून भारताला डिवचण्याचा चीनने प्रयत्न केला होता. भारताने नाव बदलण्यावरून चीनची खिल्ली उडवताना आधी सीमेवर शांतता प्रस्थापित करा, असा उपरोधिक सल्लाही दिला होता. याआधीही २०२० मध्ये चिनी सैनिकांनी अशाच प्रकारे पाच तरुणांचे अपहरण केले होते. अर्थात, त्यांना सोडून देण्यात आले होते. या तणावात आता तरुणाच्या अपहरणाची भर पडली. दरम्यान, या प्रकरणावर भारतीय अधिकाऱ्यांनी चिनी अधिकाऱ्यांशी हॉटलाईनवरून संपर्क साधला असून मिराम तारोनला शोधण्यासाठी मदतीची मागणी केली आहे. हा तरुण जंगलामध्ये वनौषधी शोधण्यासाठी गेला होता, असे सांगण्यात आले आहे. अद्याप चीनकडून याचे उत्तर आलेले नाही.
राहुल यांचा केंद्रावर हल्लाबोल
या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्विट करून मोदींवर हल्ला करण्याची संधी साधली. प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी भारताच्या एका भाग्यविधात्याचे चीनने अपहरण केले आहे. आम्ही मिराम तारौनच्या कुटुंबीयांसोबत आहोत आणि उमेद सोडणार नाही, हार मानणार नाही. पंतप्रधानांचे भेकड मौन हेच त्यांचे वक्तव्य आहे. त्यांना काहीही फरक पडत नाही, असा टोला राहुल गांधींनी लगावला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.