कंदहारचा डाग लागलेला, वाजपेयींचा विश्वासू सहकारी 

Jaswant Singh
Jaswant Singh

भाजपचे ज्येष्ठ नेते, जसवंत सिंह यांचं निधन झालं. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातील एक विश्वासू सहकारी म्हणून जसवंतसिंह यांचा उल्लेख केला जात होता. वाजपेयी सरकारचे संकटमोचक म्हणून त्यांची ओळख होती. यूपीए सरकारच्या काळात प्रणव मुखर्जी यांनी सरकारला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जी भूमिका बजावली तीच भूमिका वाजपेयींच्या काळात, जसवंतसिंह यांनी बजावली होती. 

कंदहारचा डाग 
जसवंत सिंह यांनी राजकीय कारकिर्दीत कितीही चांगलं काम केलं असलं तरी, त्यांच्यावर कंदहार प्रकरणाचा डाग कायम राहिला. वाजपेयी सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच 24 डिसेंबर 1999 रोजी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सचे एक विमान नेपाळमधून हायजॅक केले होते. विमानातील प्रवाशांची सुखरूप सुटका करण्याच्या मोबदल्यात तीन दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती. त्यात जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचाही समावेश होता. दहशतवाद्यांनी विमान अफगाणिस्तानच्या कंदहार विमानतळावर उतरवलं होतं. परराष्ट्रमंत्री असलेल्या जसवंतसिंहांनी स्वतः कंदहारला जाऊन, तीन दहशतवाद्यांच्या मोबदल्यात प्रवाशांची सुटका करून घेतली होती. या निर्णयावरून जसवंतसिंह यांच्यावर खूप टीका झाली होती. कारण, मसूद अझहरने त्या सुटकेनंतर, दहशतवादी कारवाया वाढवल्या. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यातही अझहरचा हात असल्याची माहिती आहे. 

पोखरणनंतर जगाचा सामना केला
भारताने 1998मध्ये पोखरणमध्ये अणुचाचणी केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे पडसाद उमटले होते. अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध घातले होते. त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील टीकेला जसवंतसिंह सामोरे गेले होते. भारताने केलेली अणुचाचणी कोणावर हल्ला करण्यासाठी नाही तर, स्वसंरक्षणासाठी असल्याचा मुद्दा तात्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मांडला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा मांडण्याचं काम जसवंतसिंह यांनी त्यावेळी केलं होतं. 

वेगळी आणि ठाम भूमिका
जसवंतसिंह भाजपमध्ये असले तरी अनेकदा त्यांची भूमिका पक्ष आणि पक्षातील नेत्यांच्या मतांविरुद्ध असायची. बाबरी मशीद प्रकरणावर जसवंतसिंह यांनी कधीही भाष्य केले नाही. संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला युद्ध करून प्रत्युत्तर देण्याची भाषा संसदेतील नेते मंडळी करत होते. परंतु, युद्ध आपल्याला परवडणारे नाही आणि तो पर्यायही नाही या मतावर जसवंतसिंह ठाम होते. युद्ध टाळण्यासाठी त्यांनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आणि त्यात ते यशस्वीही झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com