नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केवळ समभागांच्या विक्रीतून कोरोना काळातही तब्बल १० हजार कोटी रुपयांचा घसघशीत नफा मिळविला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत याद्वारे एलआयसीला इतकी मोठी रक्कम मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘एलआयसी’चे २५ टक्के भागभांडवल शेअर बाजाराद्वारे गुंतवणूकदारांना खुले करण्यात येईल असे सांगून एलआयसीच्या निर्गुंतवणुकीकरणाची प्रक्रिया गतिमान करण्याचे स्पष्ट केले होते. प्राथमिक सार्वजनिक विक्रीत १० टक्के समभाग कर्मचारी आणि पॉलिसीधारकांसाठी व काही टक्के विमा विक्रेत्यांसाठी राखून ठेवावे अशीही मागणी सरकारच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी म्हटले होते.
एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी असल्याने या कंपनीच्या प्रस्तावित खासगीकरणाच्या हालचालींना विरोध होत आहे. मात्र शेअर बाजारात सूचिबध्द झाल्यावर एलआयसीकडून किती लाभ होतो हे दाखविणारी ताजी आकडेवारी आहे. काही वर्षांपूर्वी खरेदी केलेले समभाग विकून एलआयसीला हा धनलाभ झाला आहे. हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, एचडीएफसी बॅंक, बायोकॉन लिमिटेड व हीरो मोटोकॉर्प लिमिटेड या पाच कंपन्यांचे शेअर एलआयसीने विकले. त्यातून हा नफा झाला.
एलआयसीने यंदाच्या आर्थिक वर्षात भांडवली बाजारात ९४ हजार कोटींची मोठी गुंतवणूक केली आहे. एकूण गुंतवणुकीचा आकडा आठ लाख कोटींवर पोहोचला आहे. मागील आर्थिक वर्षात एलआयसीला ७००० कोटींहून जास्त नफा झाला होता. एप्रिल ते ऑक्टोबर २०२० या काळात शेअर विक्रीतून एलआयसीला १५ हजार कोटी रुपये मिळाले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.