Locust Attack : राजस्थानच्या सीमावर्ती भागात टोळांची अंडी दिसण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या भागात टोळांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. टोळांचे हे थवे इतके धोकादायक असतात की काही मिनिटांतच ते परिसरातील संपूर्ण पीक फस्त करतात.
टोळांचे थवे जिथे जातात तिथे हाहाकार माजवतात, हे थवे शेतातील अन्नधान्य काही मिनिटांत संपवतात. आता पुन्हा एकदा टोळांचा धोका मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे. राजस्थानच्या सीमावर्ती भागात टोळांची अंडी मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत, राजस्थानमध्ये टोळ नियंत्रण टीमच्या सर्वेक्षणानुसार या अंड्यांमधून टोळ निघण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, हे धोक्याचे लक्षण आहे.
टोळ म्हणजे काय?
'टोळ' हा एक नाकतोडा प्रजातीचा उपद्रवी किटक आहे. तो हिरवी पाने खातो. याचं तोंड घोड्यासारखं असल्यानं त्याला विदर्भात 'घोड्या' असंही म्हटलं जातं. सगळ्याच प्रकारच्या वनस्पतींना धोकादायक ठरणारे हे टोळ किटक करोडोंच्या संख्येने एखाद्या प्रदेशावर हल्ला करून बघता बघता शेतातली उभी पिकं खाऊन टाकतात. आणि या यामुळं शेतीचं होणारं नुकसानाचं प्रमाण हे अतिशय मोठं असतं.
इंग्रजीत या किटकाला Locust म्हटलं जातं. या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे 'जळालेली जमिन'. म्हणजेच जिथं ही टोळधाड पडते, त्या भूप्रदेशातली पिकं पूर्णपणे उध्वस्त होतात. विशेष म्हणजे जगातला कुठलाच देश या टोळधाडीपासून सुरक्षित नाही. अगदी प्राचिन साहित्य आणि बायबलमध्येही या टोळधाडीच्या उपद्रवाचा उल्लेख आहे. या टोळाच्या अनेक प्रजाती आहेत. यापैकी वाळवंटी टोळ, प्रवासी टोळ, मुंबई टोळ या जाती; विशेषतः यातली वाळवंटी टोळ भारतात सर्वाधिक नुकसान घडवते. यांचं आयुष्य फक्त 90 दिवसांचं असतं.
हा टोळ किती अन्न फस्त करतो?
एक टोळ किटक एका दिवसात स्वतःच्या वजनाएवढं अन्न फस्त करतो आणि सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यन्त तो सतत खात राहतो. एक टोळधाड एका दिवसात 2500 लोकांचं अन्न संपवून टाकू शकते. त्यांची प्रजोत्पदन क्षमताही तितकीच मोठी असते. एका वर्षात टोळांच्या 2 ते 4 पिढ्या तयार होतात. वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्याची आणि मोठं स्थलांतर करण्याची क्षमता यांच्यात असते. वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेने हा थवा प्रवास करतो.
टोळ्यांच्या एक थव्यात जवळपास 80 लाखांहून जास्त किटक असतात आणि हा थवा 800 चौ.कि.मी पर्यंतचा विस्तिर्ण भूप्रदेश व्यापू शकतो! इ.स 1889 मधली एक टोळधाड तर सुमारे 5000 चौ.कि.मी विस्तारलेली होती असा उल्लेख आहे! एका चौ.कि.मी मध्ये पसरलेल्या टोळांचे वजनच तब्बल 116 टन असते! यावरून एका लहान टोळधाडीतही कीती मोठं नुकसान होतं यांचा अंदाज लावा!
टोळधाडीचा इतिहास
भारतात टोळधाडी आल्याचे पुरातन काळापासून नमूद झाले आहे. पावसाळ्यानंतर पाकिस्तानातून राजस्थानच्या वाळवंटी भागात शिरतात व तेथे त्यांची उत्पत्ती वाढते. नंतर थवे तयार होऊन या टोळधाड राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या उत्तर भागात पसरतात. महाराष्ट्रात 1960 ला टोळधाड येऊन गेली. त्यानंतर याबाबत सूचना आल्या, परंतु प्रत्यक्ष टोळधाड आली नाही. टोळधाडीत दोन प्रकारच्या स्थिती असतात. जेव्हा टोळांची संख्या खूप कमी व विरळ असते तेव्हा त्या स्थितीला एकाकी असे म्हणतात.
मात्र अनुकूल हवामान टोळांची संख्या पुष्कळ वाढते. त्यांचे थवे तयार होतात आणि त्यांना भ्रमण करावीशी वाटते. या स्थितीस थव्यायांची स्थिती असे म्हणतात. टोळ्यांच्या उत्पत्तीचे तीन हंगाम असतात. पहिला उन्हाळी हंगाम जानेवारी ते जून, दुसरा पावसाळी हंगाम जुलै ते ऑक्टोबर आणि तिसरा हिवाळी हंगाम नोव्हेंबर ते डिसेंबर. यातील उन्हाळी हंगामात टोळधाडी अचानक येतात आणि त्यांची उत्पत्ती फार मोठ्या प्रमाणावर होते.
भारतात 10 टोळधाडींची नोंद
भारतात यापूर्वीही अनेक टोळधाडी आल्या आहेत. त्यातील मागील शंभर वर्षांतील साधारण 10 टोळधाडीची नोंद आढळते. त्यातील सर्वात अलिकडची टोळधाड 1959 ते 1962 या काळात नोंदली गेली आहे. ज्यात पिकं आणि वनस्पती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले नमूद करण्यात आले आहे. इतक्या वर्षानंतर मे 2020 मध्ये टोळधाड महाराष्ट्रात आली आहे. प्रामुख्याने या डोळधाडीचा प्रादुर्भाव विदर्भात दिसतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.