नवी दिल्ली: स्वातंत्र्यापासून काँग्रेसने वर्चस्व राखलेल्या दिब्रुगडमध्ये या वेळी या पक्षाचा उमेदवार नाही. काँग्रेसने आघाडीत हा मतदारसंघ आसाम जातीय परिषदेला (एजेपी) सोडला आहे. मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपने वर्चस्व राखले.
सलग तिसऱ्यांदा वर्चस्व राखण्यासाठी भाजपने केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांना मैदानात उतरविले. या मतदारसंघात चहामळ्याच्या कामगारांचे वर्चस्व आहे. ३० टक्के मतदार हा चहामळ्याशी संबंधित असल्याने हे कामगारच सोनोवाल यांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.
चहाचे मळे व क्रूड तेलाच्या विहिरीमुळे हा मतदारसंघ आसाममधील औद्योगिकदृष्ट्या विकसित आहे. मोरान, दिग्बोई हे औद्योगिकदृष्ट्या विकसित भाग याच मतदारसंघात येतात. मोरोन हा भाग चहामळ्यासाठी प्रसिद्ध आहे. बहुसंख्य हिंदू मतदार असलेल्या मतदारसंघात मुस्लिम व ख्रिश्चन मतदार प्रत्येकी ५ टक्के आहे. त्याचप्रमाणे आदिवासींचे मतदारसंख्याही ८ टक्के एवढी आहे. या मतदारसंघावर स्वातंत्र्यापासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहेत.
या वर्चस्वाला पहिला धक्का २००४ मध्ये बसला. या मतदारसंघातून पहिल्यांदा आसाम गण परिषदेचा (एजीपी) उमेदवार निवडून आला होता. तेव्हा एजीपीचे उमेदवार सर्वानंद सोनोवाल होते. परंतु पुन्हा २००९ मध्ये काँग्रेसच्या पबनकुमार घाटोवार यांनी हा मतदारसंघ जिंकला. यापूर्वी १९९१ ते १९९९ पर्यंत सलग चार निवडणुकांमध्ये घाटोवार निवडून आले होते.
परंतु २०१४ व २०१९ मध्ये रामेश्वर तेली यांना भाजपचे खासदार होते. यावेळी मात्र केंद्रीय मंत्री राहिलेल्या रामेश्वर तेली यांची उमेदवार कापून पुन्हा सर्वानंद सोनोवाल यांच्यावर भाजपने विश्वास दाखविला आहे. सोनोवाल यांनी २००४ मध्ये या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. परंतु ते तेव्हा आसाम गण परिषदेचे खासदार होते.
आता केंद्रीय मंत्री असलेल्या सर्वानंद सोनोवाल यांना आसाम जातीय परिषदेचे ल्युरिनज्योती गोगोई यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे. आसाममध्ये १६ विरोधी पक्षांनी संयुक्त विरोधी पक्ष फोरम आसाम (यूओएफए) गठित केला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या आघाडीत आप व टीएमसी पक्षाचासुद्धा समावेश आहे.
या आघाडीत आसाम जातीय परिषदेचा (एजेपी) समावेश आहे. एजेपी ही ऑल आसाम स्टुडंट युनियन (आसू) व आसाम जातीयवादी युवा छात्र परिषद या दोन विद्यार्थ्यांच्या संघटनांनी मिळून स्थापन केलेला पक्ष आहे. या पक्षाचे अध्यक्ष आहेत ल्युरिनज्योती गोगोई. या आघाडीत हा मतदारसंघात ‘एजेपी’ला सुटला आहे.
गोगोई यांचा या भागात कामगारांसाठी लढणारा लढाऊ नेता म्हणून चांगला प्रभाव आहे. परंतु भाजपचा प्रभाव कायम आहे. या मतदारसंघातील सर्व ९ ही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत. यामुळे अनुभवी काँग्रेस नेत्यांच्या अनुपस्थितीत गोगोई कितपत सामना करतील, यावरच या लढतीचे चित्र अवलंबून आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.