श्रीनगरमध्ये २५ वर्षांतील नीचांकी तापमान; गोठलेल्या दल सरोवरावरून पायी न जाण्याची सूचना 

श्रीनगरमध्ये २५ वर्षांतील नीचांकी तापमान; गोठलेल्या दल सरोवरावरून पायी न जाण्याची सूचना 

श्रीनगर - काश्‍मीरमधील प्रसिद्ध दल सरोवरचा बहुतेक सर्व भाग गुरुवारी गोठला. श्रीनगरमध्ये काल रात्री पारा उणे ८.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. गेल्या २५ वर्षांतील हे नीचांकी तापमान आहे. २० जानेवारी १९९१ मध्ये शहरात किमान तापमान उणे ११.८  तर ३१ जानेवारी १९९३ मध्ये उणे १४. ४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. 

सरोवर गोठले असले तरी त्यावरुन चालणे धोकादायक असल्याने तसे न करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिला आहे. उपायुक्त डॉ. शाहीद इक्बाल चौधरी म्हणाले, ‘‘गोठलेल्या पाण्यावर चालण्याचे साहस लोकांनी करू नये, यासाठी परिसरात राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची (एसडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत.’’ गोठलेल्या दल सरोवरावर चालणे धोकादायक आहे. त्यामुळे ते टाळा, असे ट्विट त्यांनी केले आहे. एका प्रसिद्ध डॉक्टर म्हणाले की, बर्फावर खेळताना बुडून मरण पावलेल्यांमध्ये नऊ वर्षांखालील मुलांची संख्या ५० टक्के आहे.  बर्फावरुन वाहने चालविताना मृत्यू पावलेल्यांमध्ये २४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांची संख्या जास्त आहे. 

दल सरोवरावरून चालविली जीप
दल सरोवर १९६०च्या दशकात गोठले होते.आताही ते असेच गोठले असल्याने स्थानिकांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तत्कालीन जम्मू-काश्‍मीर राज्याचे प्रमुख पंतप्रधान बक्षी गुलाम मुहमद यांनी त्यावेळी सरोवराच्या हजरतबल किनाऱ्याजवळ सुमारे २० मिनिटे जीप चालविली होती. त्यानंतर गोठलेल्या पाण्यावर चालण्यासाठी लोकांची एकच गर्दी झाली होती आणि पुढे याला जणू उत्सवाचे रूप आले, अशी आठवण स्थानिक सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com