नवी दिल्ली - पर्यावरण बदलामुळे भारतातील मॉन्सूनचा प्रभाव अधिक तीव्र आणि बिकट परिस्थिती निर्माण करणारा होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. या बदलाचा अन्नसाखळी, कृषी आणि अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होण्याचा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.
‘अर्थ सिस्टीम डायनॅमिक्स’ या नियतकालिकात याबाबतचे विश्लेषण मांडण्यात आले आहे. या विश्लेषणात जगभरातील ३० हून अधिक पर्यावरण प्रारुपांची तुलना करण्यात आली. त्याचा अभ्यास केल्यानंतर, आगामी काळात मॉन्सूनच्या काळातील पाऊस अधिक मुसळधार असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या भारत आणि आसपासच्या देशांत अधिक पाऊस पडणे ही चांगली गोष्ट नसल्याचे संशोधकांनी नमूद केले. भारतीय अर्थव्यवस्था आणि अन्न व्यवस्था पावसात होणाऱ्या बदलांबाबत अत्यंत संवेदनशील आणि अस्थिर असते.
१९५० च्या दशकापासून निसर्गातील मानवी हस्तक्षेपाने पर्यावरणातील होणाऱ्या बदलांनी हजारो वर्षांमध्ये झालेल्या नैसर्गिक बदलाच्या वेगाला मागे टाकण्यास सुरवात केली आहे. मॉन्सूनचा अधिक अस्थिर आणि अनियमित हंगाम त्या भागातील शेती आणि अर्थव्यवस्थेसाठी धोका असतो. हवामानातील बदल टोकाचे आणि त्यांच्या गंभीर परिणामांचा अंदाज न करता येणारे आहेत, असे लक्षात येत असल्याचे मत अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील लेखक अँडर्स लेव्हर्मन यानी सांगितले.
तापमानवाढ करण्याऱ्या प्रत्येक अंश सेल्सिअस-मुळे मॉन्सूनचा पाऊस पडण्याचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे भारतात मॉन्सूनचा पाऊस पूर्वीपेक्षा अधिक जोरदारपणे कोसळत आहे आणि हे प्रमाण आधी केलेल्या अंदाजापेक्षा कितीतरी अधिक आहे.
- अँजा कॅटझेनबर्गर, संशोधक
संशोधकांचे म्हणणे
प्रत्येक पावसाळ्यात तुमचे रस्ते आणि लोहमार्ग पुराच्या पाण्याखाली जात असतील, तर स्थानिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणारच
भारतातील मॉन्सूनमध्ये जितकी अनियमितता येईल, त्यानुसार बदल करणे तितकेच अवघड जाईल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.