मातृभाषेला तुच्छ लेखण्याची वृत्ती बदलणे गरजेचे - व्यंकय्या नायडू

venkaiah-naidu
venkaiah-naidu

नवी दिल्ली - एखाद्याच्या मातृभाषेला कमी लेखणे आणि इंग्रजी भाषा येणे म्हणजे कर्तृत्वाचे खोटं बिरुद मिरवण्याच्या मानसिकतेमुळे भारतीय भाषांचे अपरिमित नुकसान झाले आहे. मातृभाषेला तुच्छ लेखण्याची ही वृत्ती बदलण्याची गरज आहे. लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसद सदस्यांनी ही भावना बदलण्यासाठी सक्रिय प्रयत्न करावेत, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्याच्या (ता २१) आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांना नायडूंनी पत्र पाठविले आहे. भारतीय भाषांचे संवर्धन, प्रसार, दैनंदिन जीवनात त्यांचा सातत्याने जाणीवपूर्वक वापर करण्यासाठी व्यापक सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे आहे. नायडू यांनी पत्रात म्हटले ,की दर दोन आठवड्यांनी एक जागतिक भाषा नामशेष होत आहे. खुद्द भारतात सुमारे १९,५०० भाषा आणि बोली भाषा आहेत आणि त्यापैकी जवळपास २०० त्वरित नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

भारत ''विविधतेत एकते''चे प्रतीक असलेल्या अनेक भाषा आणि संस्कृती याची एक कलाकृती असल्याचा अभिमान वाटायला हवा. हे जगालाही लागू आहे. केवळ मातृभाषेच्या संवर्धनातून वैविध्यपूर्ण संस्कृतीचे वैभव जतन करता येऊ शकते. नायडू पुढे म्हणतात, की संस्कृती आणि भाषा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जास्तीत जास्त भाषा शिकणे निश्चितच उपयुक्त आहे. कारण त्यामुळे जगाकडे पाहण्यासाठी कवाडे खुली होतात.  

शिवाय इतर देशांबरोबर सांस्कृतिक सामंजस्य, शांतता आणि सुसंवाद देखील घडवतात. मात्र  एखाद्याचा मातृभाषेचा पाया भक्कम नसेल तर ते साध्य करता येत नाही. मातृभाषा हा जीवनाचा आत्मा आहे. तुम्ही संसदेत प्रतिनिधित्त्व करत असलेल्या तुमच्या मतदारसंघामध्ये मातृभाषांना चालना देण्यासाठी सक्रिय सहाय्यक बनण्याची विनंती उपराष्ट्रपतींनी खासदारांना केली आहे. मातृभाषेचे महत्त्व आणि त्यांचे संवर्धन आणि  प्रसार याविषयी जागरूकता वाढवणे आणि त्यासाठी योग्य धोरणे स्वीकारून संवाद आणि संपर्क कार्यक्रम हाती घेण्याचे आवाहनही त्यांनी पत्रात केले आहे.

राज्यसभेतील उदासीनता 
राज्यसभेत खासदारांनी जास्तीत जास्त आपल्या मातृभाषेतून बोलावे यासाठी नायडू विलक्षण आग्रही आहेत. तथापि बंगाल आणि तमिळनाडूसारखी राज्ये वगळता महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील खासदार मात्र मातृभाषांऐवजी इंग्रजी व हिंदीलाच प्राधान्य देत असल्याचे दिसते. लोकसभेत सुनील तटकरे , डॉ.भारती पवार, गिरीश बापट, विनायक राऊत, अरविंद सावंत, धैर्यशील माने आदी खासदार अनेकदा मराठीतून बोलतात. तथापि राज्यसभेतील शिवसेनेसह बहुतांश पक्षांचे बहुतांश मराठी खासदार प्रामुख्याने इंग्रजी व हिंदीचा वापर करतात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com