राजस्थानात काँग्रेससह अपक्ष आमदार हॉटेलवर हलवले, भाजपकडून घोडेबाजार?

rajsthan congress mla
rajsthan congress mla

जयपूर, ता. ११ (पीटीआय) : राजस्थानमध्ये राज्यसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील अपक्ष आमदारांना भाजपकडून प्रलोभन दाखविले जात असल्याचा आरोप केला जात असून निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी काल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी बैठक बोलावली होती. त्यानंतर कॉंग्रेसने अपक्षांसह ११० आमदारांना जयपूरच्या हॉटेल शिवविलास येथे हलविले. त्यानंतर गेहलोत यांनी हॉटेलमध्ये जाऊन आमदारांची भेट घेऊन एकजूट राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, आरोप सिद्ध करून दाखवावेत, असे आव्हान राजस्थान भाजपने दिले आहे. 

राजस्थानात येत्या १९ जून रोजी तीन जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. यामुळे कॉंग्रेसकडून रणनिती आखली जात आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, की राज्यात कॉंग्रेस आणि अपक्ष आमदार एकत्र असून कोणत्याही स्थितीत घोडेबाजार होऊ देणार नाही. भाजपकडून पाच ते दहा कोटीची ऑफर दिली जात असून पैसेदेखील ट्रान्सफर होत असल्याची माहिती मिळत असल्याचे ते म्हणाले. राजस्थानातील राज्यसभेच्या निवडणुका दोन महिन्यांपूर्वीच होऊ शकल्या असता. परंतु गुजरात आणि राजस्थानमध्ये भाजपला आमदारांची पळवापळवी करता न आल्याने भाजपने उशीर केल्याचे, गेहलोत म्हणाले.

कॉंग्रेसचे महेश जोशी यांनी एसीबीकडे पत्र लिहून आमदारांना पैशाचे आमिष दाखवले जात असल्याची तक्रार केली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यादरम्यान जयपूरमध्ये मोठी रक्कम ट्रान्सफर झाल्याचा सुगावा लागला असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. 

भाजपकडे जनमत नाही. त्यांचा इतिहासच मुळातच लोकशाहीची तोडफोड करण्याचा आहे. परंतु राजस्थानाची वीर भूमी भाजपचे षड्‌यंत्र कधीही यशस्वी होऊ देणार नाही. 
रणदीप सुरजेवाला, कॉंग्रेस नेते 

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी उमेदवार निश्‍चित केलेले असताना कोणत्याही प्रकारचा संभ्रम बाळगण्याची गरज नाही. कॉंग्रसचे सर्व आमदार एकजूट आहेत. दोन्ही जागा कॉंग्रेस जिंकेल. 
सचिन पायलट, उपमुख्यमंत्री 

वसुंधरा राजे समर्थक आमदारांवर नजर 
माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या जवळचे अपक्ष आमदार हे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे जाऊ शकतात, अशी खबर आहे. त्यापैकी अनेक अपक्ष कॉंग्रेसला पाठिंबा देऊ शकतात. भाजपचे बंडखोर आणि अपक्ष आमदार ओमप्रकाश हुडला यांनी आम्ही गेहलोत यांच्यासमवेत असल्याचे म्हटले आहे. वसुंधरा राजे यांचे निकटवर्ती असल्याबद्दल विचारले असता, काळानुसार निर्णय घ्यावे लागतात, असे ते म्हणाले. 

कॉंग्रेस आपले अपयश झाकण्यासाठी भाजपवर आरोप करत आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांनी ५५ वर्षे घोडेबाजार केला, तेच आता भाजपला दोष देत आहेत. कॉंग्रेस पक्षातच अंतर्गत कलह आहे. आमदार पळवत असल्याचा एकतरी आरोप कॉंग्रेसने सिद्ध करून दाखवावा. 
सतीश पुनिया, भाजपचे प्रदेशाध्यक्ष. 

अशी होणार निवडणूक 
कॉंग्रेसने के. सी. वेणुगोपाल आणि नीरज डांगी यांना तर भाजपने राजेंद्र गेहलोत आणि ओकार सिंह यांना मैदानात उतरवले आहे. संख्याबळाचा विचार केल्यास भाजपकडे केवळ १ उमेदवार निवडणून आणण्याइतपत पाठबळ आहे. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी किमान ५१ मते मिळणे आवश्‍यक आहे. कॉंग्रेसला दोन्ही उमेदवार आणायचे असतील तर १०२ मतांची गरज आहे. कॉंग्रेसकडे १३ अपक्षांबरोबरच डावे, बीटीपीचे प्रत्येकी दोन आणि आरएलडीचे आमदारांचे पाठबळ आहे. भाजपकडे स्वत:चे ७२ आमदाराशिवाय तीन आरएलपीचे आमदार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com