Bihar Election: बेरोजगारी, भूकबळीवर काय म्हणणं आहे ? नित्यानंदांच्या वक्तव्यावर तेजस्वींचा पलटवार

Tejashwi Yadav
Tejashwi Yadav

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी जेडीयू-भाजप युतीसमोर राजद-काँग्रेस आघाडीने आपलं आव्हान उभं केलं आहे. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या नितीश कुमारांना एँटी-इन्कम्बसीसमोर आपली सत्ता टिकवण्याचे आव्हान असणार आहे तर विरोधकांना कोरोना, बिहार महापूर, मजूरांचे स्थलांतर अशा प्रश्नांवर निवडणुकीत बाजी मारायची आहे. बिहारमध्ये राजदची सत्ता आल्यास काश्मीरमधले दहशतवादी बिहारमध्ये आश्रय घेतील, या केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या वक्तव्याचा तेजस्वी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव हे राजद-काँग्रेस महाआघाडीचे मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार आहेत. राघोपूर मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज भरत होते. 

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलंय की, बिहारच्या या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा विजय झाल्यास दहशतवादी काश्मीर सोडतील आणि बिहारमध्ये आश्रय घेतील. त्यांच्या या वक्तव्यावर सध्या चांगलीच चर्चा होत असून या वक्तव्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर पसरला आहे.

याबाबत तेजस्वी यादव यांना विचारले असता ते म्हणाले की, बिहारमधील बेरोजगारीचा दर हा 46.6% इतका आहे. त्यांना याविषयाच्या अतिगंभीर परिस्थितीबाबत काय म्हणायचे आहे?  बिहारमधील बेरोजगारी, गरिबी, भूकबळी आणि स्थलांतराच्या गंभीर प्रश्नांबाबत त्यांचं काही म्हणणं आहे का? त्यांच्या डबल इंजिन सरकारने गेल्या 15 वर्षांत नेमकं काय केलं? ही अशी वक्तव्ये म्हणजे निवडणुकीच्या मूळ प्रश्नांपासून लोकांचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. पण आम्हाला ही निवडणूक लोकांच्या खऱ्या प्रश्नांवरच लढवायची आहे, असं रोखठोक उत्तर त्यांनी दिलं. 

शिवाय वाढत्या बेरोजगारीच्या प्रश्नाला आळा घालण्यासाठी म्हणून आपले सरकार नक्कीच प्रयत्न करेल असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, जर आमची सत्ता आली आणि आम्ही सरकार स्थापन केलेच तर आम्ही सगळ्यात आधी 10 लाख युवकांना रोजगार देऊ. आमच्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत हाच निर्णय घेतला जाईल. हे रोजगार म्हणजे सरकारी नोकऱ्या असतील शिवाय पर्मनंट स्वरुपाच्या नोकऱ्यांची तजवीज आम्ही करु. 

देशात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू केला होता. यामुळे देशभरात  पसरलेल्या बिहारच्या मजूरांनी आपल्या राज्यात पायीच स्थलांतर केले होते. कोरोनाच्या आणि महापूराच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे. या मुद्यांवर या सरकारने काय केलं असा सवाल विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जातोय. शिवाय आमचं सरकार आल्यावर आम्ही युवकांना दहा लाख रोजगार देण्याची घोषणाही विरोधकांनी आधीच केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com