नवी दिल्ली : मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असलेल्या समाजवादी पक्षाने काही दिवसांपासून उत्तर प्रदेशच्या विविध मतदारसंघातील उमेदवार बदलण्याचा सपाटा लावला. आधी जाहीर केलेल्या उमेदवारांबद्दल निर्माण झालेला संभ्रम की निवडणुकीची रणनीती म्हणून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव उमेदवार बदलत आहेत, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
‘इंडिया’ आघाडीत सामील असलेला सप उत्तर प्रदेशात ६३ जागा लढवत आहे तर काँग्रेस १७ जागांवर लढा देत आहे. सपने आतापर्यंत ६३ पैकी ५१ मतदारसंघातले उमेदवार घोषित केले. अखिलेश यादव यांनी सर्वप्रथम बदायूँ मतदारसंघातील उमेदवार बदलला होता. याठिकाणी आधी धर्मेंद्र यादव यांना तिकीट देण्यात आले. पण नंतर त्यांचे तिकीट कापून शिवपाल यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नसून आपल्या मुलास संधी दिली जावी, असे शिवपाल यांनी सांगितल्याने बदायूँमधला उमेदवार पुन्हा बदलला जाणार काय, याकडे लक्ष लागले आहे.
अखिलेश यादव यांनी ज्या अन्य मतदारसंघातले उमेदवार बदलले आहेत, त्यात बिजनौर, मुरादाबाद, नोएडा आणि मेरठ या मतदारसंघांचा समावेश आहे. बिजनौरमध्ये यशवीर सिंह यांचे नाव जाहीर करण्यात आले. नंतर त्यांचे तिकीट कापून दीपक सैनी यांना संधी देण्यात आली. तर मेरठमध्ये भानुप्रताप सिंह यांचे तिकीट कापत अतुल प्रधान यांना संधी देण्यात आली. नोएडा मतदारसंघात आधी डॉ. महेंद्र नागर यांना तिकीट देण्यात आले होते. ते कापत राहुल अवाना यांना संधी देण्यात आली. नागर यांनी आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा त्यांचे नाव जाहीर करण्यात आले.
मुरादाबादेत पक्षाने एस. टी. हसन यांचे नाव घोषित केले होते. नंतर रुची वीरा यांना उमेदवारी देण्यात आली. ज्या नेत्यांचे तिकीट कापले गेले, त्या नेत्यांनी पक्षाविरोधात थेट बंडखोरी केली नसली तरी नव्याने देण्यात आलेल्या उमेदवारासाठी ते कितपत खिंड लढविणार? हा प्रश्न आहे. रणनीती म्हणून अखिलेश उमेदवार बदलत आहेत, त्यांच्या मनात संभ्रम आहे, याचे कोडे सपच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना पडले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी अखिलेश यादव यांनी ऐनवेळी उमेदवार बदलाच्या अशाच चुका केल्या होत्या व त्याचा फटका जबर पक्षाला बसला होता.
प्रचारावरून गोंधळ
उमेदवारांची अदलाबदल सुरू असताना पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील आठ जागांवर मतदान होणार आहे. यात सात ठिकाणी समाजवादी पक्ष आणि एका ठिकाणी कॉंग्रेस लढत आहे. मात्र प्रचाराच्या रणनितीवरून अद्याप कार्यक्रम ठरलेला नाही. अखिलेश यादव एकटेच प्रचार करणार की, राहुल गांधी आणि अखिलेश यादव एकत्र येऊन या जागांवर मतदारसंघात प्रचाराचा धुराळा उडवणार, हे अद्याप काहीच ठरलेले नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.