‘शेतकरी आंदोलन गांभीर्याने घ्या’ - शरद पवार

Sharad-Pawar
Sharad-Pawar

नवी दिल्ली - कृषी सुधारणा कायद्यावरून शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये तणातणी कायम असताना ज्येष्ठ नेते आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकरी आंदोलन गांभीर्याने घेण्याचा आणि संवादातून हा मुद्दा सोडविण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. 

केंद्र सरकारने बुधवारी (ता. ३०) शेतकरी संघटनांशी चर्चेची तयारी दर्शविली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत आलेल्या शरद पवार यांची आज सायंकाळी माकप सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी भेट घेऊन शेतकरी आंदोलनासह विविध मुद्द्यांवर तासभर चर्चा केली. या भेटीदरम्यान अन्य राजकीय विषयांवरही चर्चा झाल्याचे कळते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी सरकारला शेतकरी आंदोलन गांभीर्याने घेण्याचा आणि त्यावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, ‘‘चर्चेतून हा पेच सोडविण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. आतापर्यंत आंदोलकांपैकी पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे कानावर आले आहे. अशी परिस्थिती झाली असेल तर हे देशासाठी चांगले नाही.’’ 

शेतकरी आणि सरकारच्या बैठकीचे काय निष्पन्न होते त्याआधारे पुढील दिशा ठरविली जाईल. मात्र आंदोलन पूर्णतः अराजकीय असल्याने राजकीय पक्षांना यामध्ये हस्तक्षेपाला फार वाव नसल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. 
याआधीही पवार यांनी सरकारला शेतकरी आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. तसेच केंद्राने वेळीच हस्तक्षेप करून तोडगा काढला नाही तर, आंदोलनाचा विस्तार देशभरात होण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. तर, ९ डिसेंबरला पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, डावे पक्ष, द्रमुक या पक्षांचे प्रतिनिधीमंडळ राष्ट्रपतींना भेटले होते. यावेळी पवार यांनी सरकारला राज्यकर्त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली होती.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com