suvendu adhikari
suvendu adhikari

मोदींचीच लस घ्यावी लागेल, त्यांना विरोध म्हणजे भारत मातेला विरोध - सुवेंदु अधिकारी

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. राज्यात भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस यंच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, अमित शहा यांच्या प्रचारसभा होत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी भाजप नेत्यांवर टीका करत आहेत. निवडणुकी आधी ममतांच्या निकटवर्तीयांसह अनेक नेते तृणमूल काँग्रेस सोडून गेले आहेत. यात सुवेंदू अधिकारी यांचाही समावेश असून सुवेंदू हे ममता बॅनर्जींविरोधात नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. ममता बॅनर्जी यांनी पूर्व मदिनापूर इथल्या रॅलीत टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहराही बघायचा नाहीय असं म्हटलं होतं. याला उत्तर देताना भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी मोदींविरोधात बोलणं म्हणजे भारत मातेविरुद्ध बोलण्यासारखं असेल असं म्हटलं आहे. 

ममता बॅनर्जींनी पूर्व मदिनापूरमध्ये हल्लाबोल केला होता. त्याला उत्तर देताना सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं की, कोरोनाविरुद्ध लढताना तुम्हाला पंतप्रधान मोदींचीच लस घ्यावी लागेल. मोदी हे निवडून आलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्याविरोधात बोलणं म्हणजे लोकशाहीविरुद्ध बोलणं आहे. मोदींविरोधात बोलणं म्हणजे भारत मातेविरुद्ध बोलण्यासारखं आहे. सध्या पाकिस्तान आणि बांगलादेशकडे लस नाही. त्यामुळं तुम्हाला मोदींचीच लस घ्यायला लागणार आहे असंही सुवेंदू अधिकारी यांनी म्हटलं. 

पायाला दुखापत झाल्यानंतर ममता बॅनर्जी या व्हीलचेअरवरून प्रचार करत आहेत. पूर्व मदिनापूर इथल्या प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ममता बॅनर्जींनी यावेळी म्हटलं की, भाजपला आता निरोप द्या, आम्हाला भाजप नको आहे. आम्हाला मोदींचा चेहराही बघायचा नाही. आम्हाला दंगल, चोर, दुर्योधन, दु:शासन, मीर जाफर नको आहे असं म्हणत मोदींवर घणाघाती टीका केली. 

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक आठ टप्प्यात होणार आहे. यात ममतांनी ज्या विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला आहे त्या नंदीग्राममध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. एक एप्रिल रोजी नंदीग्राममध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रामुख्यानं भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात लढत होत आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 मार्चला तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होणार आहे. दोन मे रोजी मतांची मोजणी होणार असून बंगालच्या जनतेचा कौल काय लागणार याकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com