कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजप विरोधात बोलणाऱ्या नेत्यांना तुरुंगात पाठवणारे भाजप आणि केंद्र सरकार हुकूमशहासारखे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ममता म्हणाल्या की, 'कोणताही विरोधी पक्षाचा नेता भाजपच्या विरोधात बोलला तर दुसऱ्याच दिवशी सीबीआय आणि ईडी त्याच्या घरी पोहोचतात. भाजप किती प्रामाणिक आहे हे सर्वांना माहीत आहे.
भाजपला कोंडीत पकडण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी 2002 च्या गुजरात दंगलीचाही उल्लेख केला. ममता म्हणाल्या, "ते म्हणतात की बंगालमध्ये नरसंहार झाला. तुम्हाला नरसंहाराचा अर्थ समजतो का? ते गोध्रामध्ये घडले. ते बिल्किससोबत घडले आणि ते NRC/CAA वेळी घडले. दिल्लीत काय झाले?" बंगालबाबत केंद्राच्या कथित भेदभावपूर्ण वृत्ती आणि राज्याला आपला निधी न दिल्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी दोन दिवसांपासून आंदोलनावर बसल्या आहेत.
भाजप विरोधी पक्षातील प्रत्येकाला भ्रष्ट आणि देशद्रोही म्हणत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे. फक्त स्वतःच प्रामाणिक आणि देशभक्त आहे. विरोधी पक्षात असे कोणतेही नेते राहिले नाहीत ज्यांच्यावर सीबीआय आणि ईडीचे छापे पडले नाहीत. ममता म्हणाल्या की, भाजपने देशातील एलआयसी ते एसबीआयपर्यंत सर्व काही विकले आहे. काही मोजकेच लोक देश चालवत आहेत.
ममता पुढं म्हणाल्या की, 'देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. भाजपची सत्ता असलेली राज्ये सोडली तर केंद्राने इतर राज्यांना अनेक केंद्रीय योजनांचे पैसे देणे बंद केले आहे. केंद्र बंगालसोबत सर्वाधिक भेदभाव करत आहे. बंगालमध्ये सर्वाधिक ६३ केंद्रीय योजना बंद करण्यात आल्याचा दावा ममतांनी केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.