‘नागरिकत्वा’च्या घटनात्मक दर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काय भूमिका घेतली

Supreme-Court
Supreme-Court

नवी दिल्ली - देशभरात नागरिकत्व कायद्यावरून आंदोलन पेटले असताना सर्वोच्च न्यायालयानेदेखील आज या संदर्भात सावध भूमिका घेतली. देश कठीण परिस्थितीतून जातो आहे, या कायद्यावरून अनेक भागांमध्ये हिंसक आंदोलनेदेखील होत आहेत, आधी हा हिंसाचार थांबू द्या, असे सांगत न्यायालयाने यासंदर्भातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.

नागरिकत्व कायद्याला घटनात्मक म्हणून घोषित केले जावे अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. एखाद्या कायद्याला घटनात्मक दर्जा मिळावा म्हणून याचिका सादर होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत  सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

‘सध्या देशाच्या अनेक भागांमध्ये हिंसाचार सुरू आहे, देशातील स्थिती कठीण आहे, त्यामुळे पहिले प्राधान्य हे शांतता प्रस्थापित करण्यास द्यायला हवे. एखाद्या कायद्याची वैधता तपासणे अथवा त्याला घटनात्मक मान्यता नाकारणे हे न्यायालयाचे काम आहे. नागरिकत्व कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरही हिंसाचार थांबल्यानंतर सुनावणी घेतली जाईल, असे न्या. बोबडे यांनी नमूद केले. ज्या खंडपीठासमोर नागरिकत्व कायद्याबाबत सुनावणी झाली त्यात, न्या. बी. आर. गवई आणि न्या. सूर्यकांत यांचाही समावेश होता.

आंदोलकांवर कारवाईची मागणी
नागरिकत्व कायद्याला घटनात्मक असे घोषित करून त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यांना निर्देश दिले जावेत, अशी मागणीही या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ज्येष्ठ विधीज्ञ विनीत धांडा यांनी आज याप्रकरणी न्यायालयामध्ये याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. याचिकाकर्त्यांचे सर्वच युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर याचिकाकर्ते पुनीतकौर धांडा यांनी ती मागे घेतली. नागरिकत्व कायद्यासंदर्भात अफवा पसरविणारे सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि माध्यम संस्थांविरोधात कारवाई केली जावी, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती.

वैधता पडताळून पाहणार
तत्पूर्वी १८ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नागरिकत्व कायद्याची घटनात्मक वैधता पडताळून पाहण्याची तयारी दर्शविली होती; पण त्याच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यास मात्र नकार दिला होता. दरम्यान, या कायद्याविरोधात न्यायालयामध्ये ५९ याचिका दाखल झाल्या असून यामध्ये भारतीय मुस्लिम लीग, काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या याचिकांचाही समावेश असून, त्यावर २२ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com