‘योगीं’च्या गडावर ‘आप’ देणार धडक; अरविंद केजरीवाल यांची रणनिती

Arvind-and-Yogi
Arvind-and-Yogi

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत सलग तीन निवडणुका जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाने आता उत्तर प्रदेशाकडे लक्ष वळविले आहे. यूपीच्या जनतेलाही दिल्लीकरांसारख्या सुविधा हव्या आहेत व एकदा ‘आप’ला कौल दिला की तेथील जनता इतर पक्षांना विसरून जाईल, असे आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगून २०२२ च्या निवडणुकीत योगी आदित्यनाथांच्या गडाला धक्के देण्याचा मनसुबा बोलून दाखविला.

- मुख्य बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यूपीच्या पुढच्या निवडणुका ‘आप’ सक्रियपणे लढवेल असे सांगून केजरीवाल म्हणाले की मोफत वीज, चांगले शिक्षण व आरोग्याच्या सुविधा यूपीच्या जनतेलाही का मिळू नयेत. घाणेरडे राजकारण व भ्रष्ट नेत्यांनी यूपीला प्रगतिपथावर जाण्यापासून रोखले असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. दिल्लीची निवडणूक जिंकल्यावर केजरीवाल यांच्या पक्षाने पुन्हा राष्ट्रीय राजकारणात उतरण्याच्या दृष्टीने आखणी सुरू केली. पंजाबमध्ये २०२२ च्या सुरवातीला व त्याच वर्षीच्या उत्तर प्रदेशातील निवडणुकांतही उतरण्याची केजरीवाल यांची ताजी घोषणा महत्त्वाची मानली जाते. पंजाबमध्ये ‘आप’चे लक्षणीय बल आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना केजरीवाल यांनी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्यावर टीकास्त्र सोडले. पाठोपाठ उत्तर प्रदेशातही दिल्लीसारख्याच सुविधा मिळवून देण्याची घोषणा त्यांनी केली.

यूपीमध्ये अनेक पक्ष व अनेक नेते आले व गेले आणि सर्वांनी स्वतःची घरे भरण्याच्या पलीकडे काही केले नाही असे सांगून ते म्हणाले, की छोट्या छोट्या गोष्टींसाठी यूपीच्या नागरिकांना दिल्लीत यावे लागते. कानपूरसारख्या ठिकाणच्या नागरिकांना आपल्या मुलांना दिल्लीत पाठवावे लागते.

गोरखपूरच्या नागरिकांना उपचारांसाठी दिल्लीच्या रुग्णालयांत खर्च करून यावे लागते. तेच जर या राज्यातच चांगले शिक्षण मिळाले, चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या तर त्यांना दिल्लीत येण्याची गरज भासणार नाही. यूपीतील महिलांना सुरक्षा मिळत नाही. २४ तास मोफत वीज मिळणे हा यूपीच्या जनतेचा हक्क नाही का? हेच कार्यक्रम घेऊन ‘आप’ जनतेसमोर जाईल.

दिल्लीत मोफत वीज व महिलांसह बहुतांश नागरिकांना बसप्रवासही मोफत आहे.  विविध क्षेत्रांत केजरीवाल सरकारने केलेल्या  कामांचे कौतुक झाले आहे. केजरीवाल यांनी हेच मुद्दे घेऊन दिल्लीबाहेर विस्तार करण्याची योजना आखली.

तर ‘आप’लाही आशीर्वाद
यूपीमध्ये आधीच इतके पक्ष आहेत आता ‘आप’ नवीन काय देणार? पण जे पक्ष सध्या तेथे आहेत त्यांची नियत साफ नाही ही मुख्य समस्या आहे, अशा शब्दांत केजरीवालांनी भाजप व इतर पक्षांवर हल्लाबोल केला. सरकारकडे पैशांची कमतरता नसते पण नियत साफ नसली की सारे प्रश्‍न उद्भवतात. प्रामाणिक व पारदर्शी सरकार, चांगल्या सुविधा या जोरावर ‘आप’ यूपीच्या जनतेचा आशीर्वाद मिळवेल, असेही ते म्हणाले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com