धर्माच्या बाबतीत ‘यूएन’कडून दुजाभाव; भारताचा आरोप

UNGA
UNGA

हिंदू,शीख,बौद्ध धर्मियांवरील हल्ल्यांकडे दुर्लक्ष 
न्यूयॉर्क - धर्मांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करताना संयुक्त राष्ट्रांनी कायमच दूजाभाव केल्याचा थेट आरोप आज भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतच (यूएनजीए) केला. जगभरात बौद्ध, हिंदू आणि शिखांवर होणाऱ्या हल्ल्यांची नोंद घेण्यात महासभेला अपयश आल्याची टीका भारताचे प्रतिनिधी आशिष शर्मा यांनी केली. शांततेची संस्कृती फक्त ‘अब्राहमिक’ धर्मांसाठीच असू शकत नाही, असे शर्मा यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘यूएनजीए’मध्ये आज ‘शांततेची संस्कृती’ या मुद्यावर चर्चा झाली. यावेळी भारताची बाजू मांडताना शर्मा म्हणाले की,‘जगभरात अनेक न जुळणारे दुवे आहेत. ज्यूविरोध, इस्लामविरोध आणि ख्रिस्तीधर्माला विरोध दर्शविणाऱ्या घटनांचा निषेध केलाच पाहिजे. मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या ठरावामध्ये केवळ याच तीन अब्राहमिक धर्माच्या मुद्द्यांचा उल्लेख आहे. बौद्ध, हिंदू आणि शिखांवर होत असलेल्या अत्याचारांकडे संयुक्त राष्ट्रांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. शांततेची संस्कृती निवडक धर्मांसाठी असू शकत नाही. हा दुजाभाव जोपर्यंत आहे, तोपर्यंत शांततेची संस्कृती खऱ्या अर्थाने नांदूच शकत नाही.’ आपल्याला संस्कृतींना एकत्र आणायचे आहे, त्यांच्यात भांडणे लावायची नाहीत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी त्यानुसार काम करावे आणि ‘निवडकपणा’ सोडून द्यावा, असे आवाहनही भारताने यावेळी केले.

बामियानचे दिले उदाहरण
अफगाणिस्तानमधील बामियान येथील ऐतिहासीक बौद्ध मूर्ती दहशतवाद्यांनी तोडल्या. या देशातील गुरुद्वारावरही हल्ले झाले. हिंदू मंदिरांवरही हल्ले झाले. मात्र, इस्लाम, ज्यू आणि ख्रिस्ती धर्मावर झालेल्या हल्ल्यांवेळी जितक्या ठामपणे निषेध केला जातो, तसा निषेध या घटनांच्या बाबतीत केला जात नाही, असे आशीष शर्मा यांनी निदर्शनास आणून दिले. या तिन्ही धर्मियांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे पुढील वेळी असा ठराव करताना इस्लाम,  ज्यू आणि ख्रिस्ती धर्माबरोबरच या तीन धर्मांचाही त्यात समावेश करावा, असे आवाहन यांनी शर्मा केले.

‘पाककडून ठरावाचा भंग’
कर्तारपूर साहिब गुरुद्वाराचे व्यवस्थापन बदलल्यावरून भारताने आज संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ठरावाचा भंग केल्याचे भारताने म्हटले आहे. 

पाकिस्तानने गेल्या महिन्यात पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून कर्तारपूर साहिब गुरुद्वाराचे व्यवस्थापन काढून घेत ते इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी मंडळाच्या प्रशासकाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. ‘या निर्णयामुळे पाकिस्तानने शांततेबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाचा भंग केला आहे. त्यांनी कर्तारपूर गुरुद्वाराचे व्यवस्थापन बिगरशीख व्यवस्थापनाकडे सोपविले आहे.

त्यांचा हा निर्णय शीख धर्माच्या तसेच, या धर्माचे जतन आणि संरक्षण करण्याच्या नियमाविरोधात आहे,’ असे भारताचे प्रतिनिधी आशिष शर्मा यांनी सांगितले. पाकिस्तानने त्यांची सध्याची भारतातील धर्मांविरोधात दहशतवादाला पाठिंबा देण्याची संस्कृती सोडली, घुसखोरीला पाठबळ देणे थांबविले तर दक्षिण आशियामध्ये खरीखुरी शांतता नांदू शकतेल, असेही भारताने आज संयुक्त राष्ट्रांमध्ये सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com