स्वप्नील वडनेरे : सकाळ वृत्तसेवा
Jalgaon News : शहरातील ग्रामीण पोलिस ठाण्याजवळील पोलिस वसाहत शेवटच्या घटका मोजत आहे. पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राहण्याची सोय व्हावी, यासाठी पोलिस वसाहतीची निर्मिती झाली होती. परंतु मागील दोन दशकांपासून पोलिस वसाहतीचीच वाताहत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
चाळीसगाव पोलिस वसाहतीत जवळपास ५७ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहेत. मात्र अलीकडे केवळ आठ पोलिसांची कुटुंब या वसाहतीत वास्तव्यास आहेत. या पोलिस वसाहतीतील अनेक निवासस्थाने भग्नावस्थेत आहे. (Chalisgaon police colony is in very bad condition jalgaon news)
गत दहा वर्षांपासून वसाहतीतून अनेक पोलिस कुटुंब बाहेर पडली आहेत. शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पोलिसांना खासगी घर भाड्याने घेऊन राहावे लागत आहे. तर काही पोलिस वेगवेगळ्या ठिकाणाहून 'अपडाऊन' करत नोकरी करत आहे.
चाळीसगाव शहरात अप्पर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय आहे. तसेच शहर पोलिस ठाणे आणि ग्रामीण पोलिस ठाणे सुद्धा आहे. परंतु शहरात पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या राहण्यासाठी निवासस्थाने नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
निवासस्थानाच्या भिंतीला तडे
सुरुवातीला या वसाहतीतील सर्व निवासस्थानांमध्ये पोलिसांचे कुटुंब वास्तव्य करायचे. मात्र मागील काही वर्षांच्या कालावधीत वसाहतीकडे दुर्लक्ष झाले आहे. चोवीस तास जनतेची सुरक्षा करणाऱ्या पोलिस वसाहतीच्या सुरक्षा भिंतीलाच तडे गेले आहेत. वसाहतीतील अनेक घरांचे छत तुटले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पावसाळ्यात तर या घरांच्या छतांमधून पाण्याच्या धारा लागतात. भिंतीवर वृक्ष वेली, शेवाळ वाढले असून, पोलिसांची निवासस्थाने भग्नावस्थेत गेली आहेत.तर पोलिसांच्या वसाहतीतील परिसरात वाढलेले गवत, कचरा, अनावश्यक वृक्ष, तुंबलेल्या गटारी, स्वच्छतेचा अभाव यामुळे वसाहतीला वाईट दिवस आले आहे.
दोनशे घरांचा प्रस्ताव
शहरात पोलिसांसाठी २०० घरे आणि पोलिस अधिकाऱ्यांसाठी १८ घरे नव्याने बांधण्यात यावी, यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी गृहमंत्रालयाकडे पाठपुरावा केला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, पोलिस निवासस्थानाबाबत शासनातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
शहरात पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवासस्थाने होण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सरकारकडे पाठविला आहे. लवकरात लवकर पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
वसाहत सात वर्षानंतरही ‘जैसे थे’
तत्कालीन आमदार तथा विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पाठपुराव्याने १९ फेब्रुवारी २०१६ ला चाळीसगावात ग्रामीण पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. ग्रामीण पोलिस ठाण्याच्या उद्घाटन सोहळ्यास तत्कालीन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी हजेरी लावली होती.
या उद्घाटन सोहळ्यात गृहराज्यमंत्री यांनी आपल्या भाषणात पोलिस वसाहत व पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र सात वर्षानंतरही या ठिकाणची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जावा, अशी अपेक्षा पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
"पोलिसांच्या निवासस्थानाबाबत आपला पाठपुरावा सुरूच असून, प्रस्ताव डी. जी. होशिंग यांच्याकडे पोहोचला असून, माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात पोलिसांची २०० घरे व अधिकाऱ्यांसाठी १८ घरे बांधली जावी, असा माझा प्रयत्न आहे." - मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.