Jalgaon News : लोण खुर्द (ता. अमळनेर) येथील मूळ रहिवासी व आसाम येथे सीआयएसएफमध्ये कार्यरत असलेला जवान लिलाधर नाना शिंदे (वय ४२) यांचा आसाममध्ये लष्करी वाहनातून खाली पडल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. (last rites of soldiers were performed at Lon Khurd with state honours jalgaon news)
ही घटना मंगळवारी (ता. १६) दुपारी घडली. या जवानावर शुक्रवारी (ता. १९) लोण खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रू नयनांनी त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. गावात दोन दिवस चूलही पेटलेली नाही.
लिलाधर शिंदे यांचे पार्थिव आसाम येथून गुवाहाटी व तेथून विमानाने औरंगाबादला आणण्यात आले. तेथून लष्करी रुग्णवाहिकेतून चाळीसगाव येथे आणण्यात आले. या वेळी खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
त्यानंतर अमळनेर येथील तांबेपुरा भागातील राहत्या घरी त्यांचे पार्थिव आणण्यात आले. तेथून पुढे त्यांच्या मूळ गावी लोण खुर्द येथे पार्थिव येताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. या वेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अंत्ययात्रेप्रसंगी देशभक्तिपर गीतांनी वातावरण शोकाकूल झाले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
लष्कराच्या दोन तुकड्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होत्या. महाराष्ट्र पोलिसांचीही तुकडी दाखल होती. त्यांच्यावर दुपारी तीनच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी लष्कराच्या जवानांनी व पोलिसांनी हवेत तीन- तीन फैरी झाडून मानवंदना दिली.
पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहायक निरीक्षक शीतलकुमार नाईक, सहायक निरीक्षक विनोद पाटील, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, लष्करातील सुभेदार मेजर विनायक आहेर, एच. बी. गुजर,
औरंगाबादचे लेफ्टनंट व्ही. एस. राणा आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील, संचालक डॉ. अनिल शिंदे आदींसह तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आजी- माजी सैनिक फाउंडेशनचे पदाधिकारी, खानदेश रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन दिवस अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी अथक परिश्रम घेतले. जवान लीलाधर पाटील यांच्या मागे आई- वडील, भाऊ, पत्नी, मुलगा- मुलगी असा परिवार आहे. लीलाधर पाटील यांच्या मृत्यूने कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली आहे.
आमदार अनिल पाटील यांनीही भ्रणमध्वनीवरून श्रद्धांजली वाहिली. रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, गावात गुरुवारी पोटनिवडणुकीसाठी मतदान होते. मात्र, शहीद जवानाच्या घटनेमुळे ग्रामस्थांनी दुखवटा व्यक्त करून मतदान केले नाही. फक्त दोनच जणांनी मतदान केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.