जळगाव : वाळूमाफियांच्या अंतर्गत स्पर्धेतून एक महिन्यापूर्वी सचिन पाटील याने नीलेश देसले याचा पाय तोडला होता. याचा बदला घेण्यासाठी नीलेश देसले याने मुंबईच्या स्वामी टोळीला सचिनच्या हत्येची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पाळत ठेवून सचिन पाटील याच्या बुलेटला बोलेरोने धडक देत नंतर चाकूने खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
अंतुर्ली (ता. पाचोरा) येथील वाळू व्यावसायिक सचिन देविदास पाटील (वय ३६) याचा रविवार (ता. १९) खून झाला. सकाळी सातला भातखंडे ते उत्राण (ता. एरंडोल)दरम्यान नदीवरून बुलेटने जात असताना, समोरुन बोलेरो जीपने धडक देत अपघात घडवून आणला. नंतर धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला.
हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच
ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर महिला निरीक्षक निता कायटे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह फॉरेन्सीक टीम, श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एरंडोल पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखेची तीन पथके गठित करुन घटनास्थळावरूनच तपासाला सुरवात झाली.
काय होता वाद
सचिन आणि नीलेश देसले यांचा वाळूचा व्यवसाय आहे. ठेका मिळाला, तर कायद्याने नाही तर बेकादेशीर उपसा करून दोघांनी वाळू व्यवसायात जम बसविला होता. महिनाभरापूर्वी दोघांमध्ये हाणामारी होऊन सचिनने नीलेश याचा एक पाय फ्रॅक्चर केला होता. नीलेशने स्वामी टोळीशी संपर्क करून श्रीनिवास स्वामी याला सचिनच्या खुनाची सुपारी दिली.
असा रचला खुनाचा कट
सचिनचा गेम करण्यासाठी स्वामी टोळीचे गुंड १५ दिवसांपूर्वीच पाचोऱ्यात थांबले होते. आठ-दहा दिवस पाहणी केल्यानंतर ते निघून गेले. मात्र, समाधान पाटील, शुभम पाटील आणि सागर कोळी यांना पाळतीवर ठेवले होते.
नीलेशची जीप त्यांच्या दिमतीला होती. रविवारी (ता. १९) सचिन नेहमीप्रमाणे पहाटे गिरणा नदीवर वाळूच्या कामाची लाईन लावून परतत असताना, श्रीनिवास स्वामी याला भ्रमणध्वनीवरून तो निघाल्याची टीप दिली. त्यावरून सचिनचा खून केला व जिपने पळ काढला.
जीप कानळद्यातून जप्त
मुंबईच्या टोळीने गुन्ह्यात वापरलेली जीप कानळदा रस्त्यावर सोडून पळ काढला. गुन्हे शाखेच्या पथकाने जीप व शस्त्र जप्त केली असून, तिच्यावर मालेगाव पासिंगची नंबर प्लेट लावली होती. चेसिस नंबरवरून ती गाडी नीलेश देसले याची असल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हे शाखेने देसले याच्या घरी जाऊन चौकशी केली. त्याने आपण जेलमध्ये असताना, श्रीनिवास याला सांगितले होते, पण तो खून करेल याची खात्री नसल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले. त्याच्या घरावर पहारा लावला असून, समाधान पाटील व शुभम पाटील यांना अटक केली असून, दोघांना २३ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. सागर कोळी याची चौकशी सुरू आहे. तर मुंबईच्या टोळीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.