Jalgaon News : मृग नक्षत्र लागून देखील पावसाने डोळे वर केल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. ज्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, त्या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी अक्षरशः जीवघेणी कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळा सुरु होऊनही अनेक गावांमध्ये पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आहे त्या गावांना पाऊस येईपर्यंत टँकर सुरू ठेवावेत, असे पत्र गटविकास अधिकाऱ्यांनी तालुका प्रशासनाला दिले आहे. पाणीटंचाईचे सावट अजूनही असल्याने पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Water scarcity in Parola taluka Water supply by tankers acquisition of wells continued Life threatening exercise of villagers for water Jalgaon News)
जून महिना उलटून पंधरा दिवस होऊनही अद्याप पावसाची चिन्हे नाहीत. ८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरवात झाली. हवेत गारवा निर्माण होण्यासह काही वेळा वादळी वाऱ्यासारखी परिस्थिती या पलिकडे काहीही होत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. सध्या सर्वच जण वरूणराजाची प्रतीक्षा करीत आहेत.
‘तहसील’ शी पत्रव्यवहार
येथील पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणार्थ मुदतवाढबाबत तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार केलेला आहे. दोन महिन्यांपासून तालुक्यातील खेडीढोक व हनुमंतखेडे येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. याशिवाय पोपटनगर, महाळपूर, शेळावे खुर्द, कराडी, कोळपिंप्री व मोहाडी या गावांमधील विहिरी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत.
सध्या याच विहिरींचे पाणी त्या त्या गावांमधील ग्रामस्थांना पुरवले जात आहे. या भागात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे या ठिकाणी पाणीटंचाई वाढू नये यासाठी पंचायत समितीच्या पाणीटंचाई विभागाकडून टंचाई निवारणार्थ टँकर व विहीर अधिग्रहणासाठी मुदतवाढ मिळावी, असे पत्र १ जूनला तहसील कार्यालयाकडे पाठवले आहे.
या पत्रानुसार, मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याने पावसाळा सुरु झाला तरी या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरुच राहणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पाऊस आणखीन लांबणीवर पडला तर पाणीटंचाईचे सावट आणखीन गडद होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
चारा छावणीची मागणी
सध्या ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे काही भागात गुरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होण्याची शक्यता दिसत आहे. तर काही भागात चारा देखील उपलब्ध होऊ शकत नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने या संदर्भात गावागावातून माहिती घेऊन आवश्यक त्या गावांमध्ये पशुधनांसाठी चारा छावण्यांसह पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
गावात टँकर येताच होते धावपळ
हनुमंतखेडे (ता. पारोळा) गावातील विहिरीत पाणी टाकण्यासाठी टॅंकर येताच बरेच ग्रामस्थ पाण्यासाठी एकच धावपळ करतात. काही वेळ तर अक्षरशः जीव मुठीत धरून एक एक पाण्याच्या हंड्यासाठी कसरत करताना दिसतात. वास्तविक, अशा वेळी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असताना सुरक्षेच्या दृष्टीने विहिरीवर कोणीही उपस्थित राहत नाही. त्यामुळे विहिरीतून पाणी काढताना एखाद्याचा तोल जाण्याची भीती असते. ही परिस्थिती लक्षात घेता, ग्रामस्थांनीच आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने टँकर गावात आल्यानंतर घाई न करता, टँकर विहिरीत ओतून झाल्यानंतर शांततेने पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.