पूर, दरडी कोसळल्यामुळे 35 जणांचा बळी गेला आहे.
रत्नागिरी: अतिवृष्टीच्या तडाख्यामुळे चिपळूण, खेडला जलप्रलयाचा तडाखा बसला असून यामध्ये घरे, दुकाने यासह छोट्या-मोठ्या 20 हजार मालमत्तांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यात चिपळूणमध्ये 18 हजार 278 दुकानें, घरे, टपऱ्या यांचा समावेश आहे. पूर, दरडी कोसळल्यामुळे 35 जणांचा बळी गेला आहे.
गेले 20 दिवस जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. 21 जुलैपासून त्याचा जोर वाढला. चिपळूण, खेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला. जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी खेड शहरात घुसले. तर वाशिष्ठीच्या पुराने चिपळूणमध्ये दाणादाण उडवून दिली. पहाटेच्या सुमारास पुराचे पाणी शहरात घुसले. इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाण्याची उंची होती. छोट्या पान टपर्या, दुकाने, कौलारू घरे, अपार्टमेंटच्या तळमजल्यामध्ये वेगाने पाणी घुसले. वेगाने येणार्या पाण्यापुढे कुणाचे काहीच चालले नाही. वेळ कमी मिळाल्याने व्यापार्यांना माल सुरक्षित हलवण्यास वेळ मिळाला नाही. कपड्याच्या दुकानात पाणी शिरून पूर्णतः साहित्य खराब झाले होते.
कोरोनाचा जोर ओसरू लागल्यामुळे अनेक दुकानदारांनी लाखो रुपयांच्या मालाची खरेदी करून दुकानात ठेवला होता. दोन दिवसाच्या पुरात त्याचे नुकसान झाले. व्यापार्यांचेच सुमारे पन्नास कोटी रुपयांचे नुकसान झाले असावे, असा अंदाज वर्तविला जात आहे. घरातील भांड्यांपासून इलेक्ट्रीक साहित्यापर्यंत सर्वच मालमत्ता वाहून गेली आहे. सगळे संसार नव्याने सुरू करण्याची वेळ या लोकांवर आलेली आहे. पूर ओसरल्यानंतर चार दिवसांनी जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार चिपळूणमध्ये १८ हजार २७८ मालमत्ता असून खेडात १ हजार ९४० मालमत्ताचे नुकसान झालेले आहे. पूर, दरडींमुळे दोन्ही तालुक्यातील ३५ जणांचा बळी घेतला आहे. त्यात पुराचा वेढा पडल्यामुळे कोविड उपचार घेत असलेल्या दहाजणांचा समावेश आहे. खेड, पोसरे येथे दरड कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला.
नुकसानीचा आकडा दोन दिवसात स्पष्ट
पंचनामे करण्याचे काम सुरू असून नुकसानीचा प्राथमिक आकडा दोन दिवसात स्पष्ट होईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या पुरामुळे शहरात साचलेला चिखल काढण्यासाठी प्रशासन काम करत आहेत. लोकांच्या प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी व्यवस्था पुरवत आहेत.
जिल्हा परिषदेचे ३५ कोटीचा फटका
जलप्रलयाचाच तडाखा ग्रामीण भागात बसला असून जिल्हा परिषद चिपळूण बांधकाम विभागाचे सुमारे ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज उपाध्यक्ष उदय बने यांनी व्यक्त केला आहे. बने सहकारी सदस्यांसह चिपळुणातील नुकसानग्रस्त गावांना भेटी देत आहेत. कोडवली, वावे, चोरवणे या गावात प्रत्यक्ष भेटी दिल्या आहे. पूल, साकव, रस्ते यांचे नुकसान झाले आहे. एकट्या चिपळूण तालुक्यातील नुकसान ८ कोटीवर गेले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.