
नवी दिल्ली ः कोरोना महामारीमुळे तसेच सुरक्षित अंतर राखण्यासाठी अनेकांनी आपले विवाह सोहळे लांबणीवर टाकले आहेत; पण अतानू दास आणि दीपिका कुमारी या भारताच्या आघाडीच्या तिरंदाजांनी याच कालावधीत लग्न करण्याचे ठरवले आहे. आता हा विवाह 30 जूनला होणार आहे. विवाहास 50 व्यक्तीच उपस्थित राहतील, ही मर्यादा सरकारने घातली आहे. त्यामुळे अतानू तसेच दीपिकाला अनेक मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक विवाह सोहळा लांबणीवर टाकण्यासाठी विनंती करीत आहेत. आमचा साखरपुडा दोन वर्षांपूर्वीच झाला आहे. तो कोणालाही न सांगता झाला होता. आता सर्वांना सांगून आम्ही विवाहबद्ध होणार आहोत. आता विवाह अवघड आहे, असे सांगितले जात असतानाच तो करण्याचे ठरवले आहे, असे अतानू दासने सांगितले.
अतानू आणि दीपीकाचा 2018 मध्ये वाड़्निश्चय झाला. त्या वेळी त्यांनी 2019 मध्ये विवाहबद्ध होण्याचे ठरवले होते. मात्र भारतीय महिला तिरंदाज संघ ऑलिंपिकला पात्र न ठरल्यामुळे दीपिका निराश झाली होती आणि त्यामुळे विवाह लांबणीवर टाकण्यात आला. दीपिकाने पात्रता साध्य केल्यावर ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेनंतर विवाहबद्ध होण्याचे ठरवले होते. मात्र आता ऑलिंपिक लांबणीवर पडल्यामुळे दोघांनी विवाहबद्ध होण्याचे ठरवले.
विवाहसोहळ्याबद्दलचे सरकारने नियम ठरवले होते. त्याचा विचार करूनच आम्ही निमंत्रितांची यादी तयार करणार आहोत. त्याचबरोबर लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांनी मास्क परिधान केला असेल, तसेच त्यांच्यात सुरक्षित अंतर असेल, याकडेही लक्ष द्यावे लागेल. मेजवानीचे वाटप करणाऱ्यांनीही मास्क तसेच ग्लोव्हज् परिधान करणे महत्त्वाचे असेल, असेही अतानूने सांगितले.
नोव्हेंबरचाही पर्याय होता....
दोन वर्षांत आम्ही किमान तीनदा लग्नाची तारीख ठरवली होती आणि त्याबाबत आई-वडिलांबरोबर बोलण्याचेही ठरवले. मात्र सर्व काही अपेक्षेनुसार घडले नाही. या वेळी मात्र राष्ट्रीय शिबिराहून आल्यानंतर आम्ही विवाह करण्याबाबत सांगितले. आत्ता आम्हाला जून तसेच नोव्हेंबरमधील मुहूर्त चांगला असेल, असे सांगण्यात आले. नोव्हेंबरमध्ये विवाह केला असता तर निमंत्रितांबाबत जास्त विचार करावा लागला नसता, पण त्या वेळी स्पर्धा सुरू होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जूनमधील तारीख ठरवली, असे अतानू म्हणाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.