IPL Coronavirus: भारतातील सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या आयपीएलवर यंदा प्रश्नचिन्ह उभं आहे. कोरोनाच्या व्हायरसचं संपूर्ण जगापुढं संकट उभं राहिलं असताना आता आयपीएल होणार की नाही यावरून उलट- सुलट चर्चा सुरू आहेत. येत्या शनिवारी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार आहे. त्यात बैठकीत यंदाच्या आयपीएलचं भवितव्य ठरणार आहे.
नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण!
जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया या देशांमध्ये मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे बळी गेले आहेत. भारतातही, कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने स्पर्धा रद्द करणे शक्य नसेल तर, प्रेक्षकांविना सामने आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या दक्षिण अफ्रिकेची टीम भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि अफ्रिका यांच्यातील धर्मशाळा इथला पहिला सामना आज, रद्द झाला आहे. तर, लखनौ आणि कोलकाता येथील सामने प्रेक्षकांविना खेळवले जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत आता आयपीएलच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळं आयपीएलची गव्हर्निंग कौन्सिल कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या भारत सरकारने काही देशांमधील नागरिकांचा व्हिसा रद्दा केलाय. ज्या देशांमधील नागरिकांचा व्हिसा रद्द केलाय. त्या देशांतून खेळाडू आयपीएलसाठी येत नसले तरी, या सगळ्या प्रक्रियेत धोका आहे, असे दिसत आहे.
क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा
आणखी वाचा - दवंडी लावून बीडमध्ये वाटले फुकट चिकन
कर्नाटक सरकारचा आयपीएलला विरोध
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचं संयोजन करू नका, असं आवाहन कर्नाटक राज्य सरकारनं केलंय. त्याचवेळी महाराष्ट्र सरकारही आयपीएल आयोजित करण्यात फारसं उत्सुक नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अनेकदा भूमिका स्पष्ट केलीय. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रेक्षकांविना आयपीएल खेळवा, असा पर्याय सुचवला आहे. पण, हा पर्याय कितपत शक्य आहे, यावरून शंका उपस्थित केली जात आहे. मैदानावर प्रेक्षक आले नाही तर, प्रत्येक टीमच्या फ्रॅंचायझीला गेट मनीवर पाणी सोडावं लागणार आहे. ही रक्कम साधारण 20 कोटी रुपयांच्या आसपास आहे. आता हे नुकसान भरून काढण्यासाठी बीसीसीआय कोणतं पाऊल उचलणार, हे पहावं लागणार आहे. आयपीएल पुढं ढकलायचा निर्णय झाला तर, कोरोना व्हायरसचं संकट किती दिवस टिकणार याविषयी कोणीही निश्चित सांगू शकत नाही. त्यातच पुढं 18 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात आयसीसीचा टी-20 वर्ल्ड कप सुरू होत आहे. त्यासाठी खेळाडूंना तयारी करावी लागणार आहे. खेळाडू किंवा त्यांचे देश वर्ल्ड कपच्या तोंडावर कोणता धोका घेतली का? याविषयीही शंका आहे. त्यामुळं यंदाच्या आयपीएलचं भवितव्य टांगणीला लागलंय.
आयपीएलसाठी थोडक्यात महत्त्वाचे
आयपीएलपुढे असलेला हा पेच अभूतपूर्व आहे. यापूर्वी स्थानिक मुद्द्यांवर कधी दुष्काळ, कधी सुरक्षा व्यवस्था यावरून आयपीएलला विरोध झाला आहे. पण, यावेळचं संकट जागतिक आहे. बीसीसीआयच्या दृष्टीने ही सर्वांत सन्मानाची स्पर्धा आहे. आयसीसीनेही त्यासाठी वेगळे दिवस काढून ठेवले आहेत. त्यामुळं यंदा स्पर्धा होणार की नाही, याविषयी आता एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. येत्या शनिवारी आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलची बैठक आहे. त्यातच यावर सगळी चर्चा होईल.
- अभय आपटे, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट संघटना
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.