मुंबई : आयसीसीच्या मालिकांमध्ये एकही सामना हरला की संघावर बाहेर जाण्याची किंवा जर-तरचे समीकरण जोडण्याची वेळ येते. अशीच काहीशी वेळ यंदाच्या विश्वचषकात भारतावर आली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर उपांत्यफेरी कशी गाठता येईल याचा विचार केला जात आहे. यामुळे मंगळवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये खेळला गेलेला सामना भारतासाठी महत्त्वाचा होता. पाकिस्तानने हा सामना जिंकल्यानंतर माजी क्रिकेटर शोएब अख्तरने भारताला टोला लगावला आहे.
ग्रुप-१ मध्ये भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड असे तीन मजबूत संघ आहेत. तर अन्य तीन संघांमधून फक्त अफगाणिस्तानचा संघ या संघांना टक्कर देऊ शकतो. पाकिस्तानने भारताला पराभूत केल्यानंतर देशाचे लक्ष पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या सामन्यावर लागले होते. पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करून उपांत्यफेरीसाठी आपले स्थान पक्के केले आहे.
दुसरीकडे रविवारी न्यूझीलंड आणि भारतात होणारा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीसाठी आपली दावेदारी कायम ठेवू शकेल. पराभूत होणाऱ्या संघाची आशा मात्र धूसर होऊन जाईल. कारण, रविवारच्या सामन्यानंतर तिन्ही संघाचे सामने कमकुवत असलेल्या अन्य तीन संघासोबत होईल. यात अनपेक्षित निकाल न लागल्यास रविवारी विजयी होणारा संघ उपांत्य फेरी गाठू शकेल.
यामुळेच शोएब अख्तरने टीम इंडियाला टोला लगावला आहे. ‘या सामन्यात भारतीयांचा जीव टांगणीला लागला होता. आम्ही विजय मिळवून भारताचे काम सोपे केले’, असे अख्तर म्हणाला. भारत पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करीत असेल हे पहिल्यांदाच घडले असेल आणि आम्ही त्यांना वाचवले. आम्ही चांगले शेजारी असल्याचे दाखवून दिले, असेही तो यू ट्यूब चॅनलवर म्हणाला.
भारत-पाकिस्तानमध्ये व्हावा अंतिम सामना
रविवारी भारताने न्यूझीलंडचा पराभव करून उपांत्य फेरी गाठावी, अशी आमची इच्छा आहे. भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत विजय मिळवून अंतिम फेरीत पुन्हा त्यांची भेट झाली पाहिजे. आम्ही त्यांचा सामना करण्यास सज्ज आहोत, असेही शोएब म्हणाला.
पाकिस्तान हा सुरक्षित देश, पण...
मी प्रत्येक पाकिस्तानी आणि भारतीयांना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला ई-मेल पाठवण्याची विनंती करतो. पाकिस्तान हा सुरक्षित देश आहे. परंतु, खेळण्यासाठी सुरक्षित संघ नाही, असेही शोएब म्हणाला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.