KL Rahul : बाशिंग बांधण्यापूर्वी kl राहुलची उडणार दांडी ?
India vs Sri lanka KL Rahul Series : टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार केएल राहुल बराच काळ त्याच्या खराब फॉर्मशी झुंजताना दिसत आहे. त्याने टी-20 विश्वचषकातही आपल्या कामगिरीने सर्वांची निराशा केली आहे. या कामगिरीनंतर उजव्या हाताच्या फलंदाजाला टीकेलाही सामोरे जावे लागले. त्याचबरोबर आता राहुलचा टी-20 फॉरमॅटमधील वेळ संपल्याचे बोलले जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 जानेवारीपासून 3-3 सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ अद्याप जाहीर झालेला नाही. टी-20 विश्वचषकातील पराभवानंतर जुनी निवड समिती बरखास्त करण्यात आली होती. आता त्यांच्यासाठी ही शेवटची पायरी असू शकते. नवीन समितीच्या निवडीला अजून आठवडा बाकी आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची निवड जुन्याच पॅनेलद्वारेच केली जाऊ शकते. पीटीआयनुसार, राहुलची टी-20 मालिकेसाठी निवड न होण्याची शक्यता आहे. विश्वचषकानंतर बांगलादेश दौऱ्यावरही केएल राहुलचा फ्लॉप शो कायम आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांच्या हवाल्याने पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, चेतन शर्माची बाहेर जाणारी निवड समिती 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी दोन मर्यादित षटकांच्या भारतीय संघांची निवड करणार आहे. नव्या पॅनलचा निर्णय आठवडाभरात होणार नाही. क्रिकेट सल्लागार समिती 26 ते 28 डिसेंबर दरम्यान निवड समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेईल अशी अपेक्षा आहे. केएल राहुल जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लग्न करणार आहे. त्यामुळे बाशिंग बांधण्यापूर्वी राहुलचे करिअर संपणार का हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे
या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, 'जुनी निवड समिती कदाचित श्रीलंकेविरुद्ध संघ निवडेल. टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी रोहित शर्मा दुखापतीतून पूर्णपणे सावरला नाही, असे आतापर्यंत दिसते आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल.
अशीही शक्यता आहे की टी-20 आंतरराष्ट्रीय संघात फक्त त्या फॉरमॅटचे विशेषज्ञ असतील. विराट कोहलीसारख्या काही वरिष्ठ खेळाडूंना टी-20 फॉरमॅटमधून ब्रेक दिला जाऊ शकतो. विराट सध्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियासोबत ढाकामध्ये आहे. भारतीय संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर चेतनच्या नेतृत्वाखालील संपूर्ण समिती बरखास्त करण्यात आली होती आणि नवीन निवडकर्त्यांची निवड करण्याच्या प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.