INDvsWI : विंडीजविरुद्ध सलग दहावी मालिका जिंकण्याची संधी हुकणार? 

India vs West Indies 2nd ODI Preview
India vs West Indies 2nd ODI Preview

विशाखापट्टणम : काही दिवसांपूर्वी ट्‌वेन्टी-20 मालिकेत निभावले होते आता एकदिवसीय मालिका गमावण्याच्या काठावर टीम इंडिया उभी आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज होत आहे. तो गमावला तर सलग नऊ मालिका विजयानंतर पराभवाची नामुष्की सहन करावी लागणार आहे. गोलंदाजीत सुधारणा झाली नाही तर विराटच्या संघाला पराभवाचा मोठा धक्का सहन करावा लागेल. 

एकदिवसीय क्रमवारीत भारत दुसऱ्या तर वेस्ट इंडिज नवव्या स्थानावर आहे. दोन दिवसांपूर्वी चैन्नईत मात्र ही वेस्ट इंडीजचा संघ किती तरी पुढे असल्याचे दिसून आले असले तरी सूमार गोलंदाजीने भारतीयांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड चालवलेली आहे. एरवी प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणणाऱ्या गोलंदाजांना चेन्नईत 287 धावांचे संरक्षण करता आले नव्हते. त्या अगोदर झालेल्या ट्‌वेन्टी-20 मालिकेतही गोलंदाजीने अडचणीत आणले होते. 

सलग तीन नाणेफेक गमावली 
मर्यादित षटकांच्या खेळात भारतीय संघ आव्हानाचा पाठलाग करण्यात तरबेज असल्याचे समजले जाते, पण प्रथम फलंदाजी की गोलंदाजी हा पर्याय निवडण्यासाठी नाणेफेक जिंकण्याचे दैव विराटच्या पाठीशी उभे राहिलेले नाही. सलग तीन सामन्यात त्याने नाणेफेक गमावलेली आहे. उद्या तरी हा कौल आपल्या बाजूने लागेल अशी आशा विराट कोहली करत असेल. 

नाणेफेकीचा आम्हाला फरक पडत नाही, कोणत्याही परिस्थितीत खेळण्याची आमची क्षमता आहे, असे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली गर्वाने सांगत आलेले आहेत, पण त्यांचा आत्मविश्‍वास गोलंदाजांनी खच्ची केलेला आहे. वेगवान गोलंदाजांबरोबर फिरकीही निष्प्रभ ठरलेली आहे. ट्‌वेन्टी-20 क्रिकेटमध्ये तर सर्वाधिक षटकार स्वीकारण्याची नामुष्की ओढावून घेतलेली आहे. त्यामुळे टप्पा आणि दिशा भरकटत असल्याचे सिद्ध होते. पहिल्या सामन्यात तर भारताने अष्टपैलू शिवम दुबेच्या पर्यायासह सहा गोलंदाज खेळवले होते. तरिही 287 धावा निर्णायक ठरवता आल्या नव्हत्या. 

गोलंदाजीत बदल निश्‍चित 
दीपक चहर, महम्मद शमी असो वा रवींद्र जडेजा या सर्वांवर वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी हुकूमत गाजवलेली आहे त्यामुळे भारताला उद्या गोलंदाजीत बदल करावा लागणार आहे. राखीव खेळाडूत शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल असे दोनच पर्याय आहेत. कुलदीपऐवजी युझवेंद्र हा बदल संभवत आहे, पण उद्याच्या सामन्यात शिवम दुबे किंवा केदार जाधव यांच्याऐवजी एखादा अतिरिक्त गोलंदाज खेळवला जाण्याची शक्‍यता आहे. त्यातच विशाखापठ्ठणमची खेळपट्टी तिनशेपेक्षा अधिक धावांची असल्याचा इतिहास असल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन सहा निव्वल गोलंदाजांसह खेळण्याचा निश्‍चित विचार करेल. 

मालिकेतचे आव्हान टिकवण्यासाठी अस्तित्व पणास लागलेले असल्यामुळे फलंदाजीत बदल होण्याची शक्‍यता कमी आहे, परंतु रोहित शर्मा-केएल राहुल यांच्यासह विराट कोहलीला मोठे योगदान द्यावे लागेल. पहिल्या सामन्यात हे तिघेही अपयशी ठरल्यानंकर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत या मधल्या फळीने डाव सावरला होता. टीम इंडियासाठी हे समाधान देणारे आहे. 

तेव्हाही होप-हेटमायरची डोकेदुखी 
विखाखापठ्ठण येथे ऑक्‍टोबर 2018 मध्ये अगोदरचा आंतरराष्ट्रीय सामनाही भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झाला होता. तो सामना भारताला जिंकता आला नसला तरी टाय झाला होता. भारताने 6 बाद 321 तर विंडीजनेही 7 बाद 321 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे त्या सामन्यातही शेय होप (नाबाद 123) आणि हेटमायर (94) हे फलंदाज भारताला डोईजड झाले होते. तीन दिवसांपूर्वी चेन्नईत या दोघांनी शतके केली होती त्यामुळे भारतासमोर होप-हेटमायर यांचेच प्रमुख आव्हान असेल. 

संघ यातून निवडणार : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, महम्मद शमी, दीपक चहर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मयांक अगरवाल, शार्दुल ठाकूर, मनिष पांडे. 

वेस्ट इंडीज : किएरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील आम्ब्रिस, शेय होप, केरी पेरी, रॉस्टन चेस, अलझारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, ब्रॅंडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, एविन लुईल, रोमारिओ शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल, हेडन वॉल्श.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com