IPL 2021 MI vs PBKS: सलग दोन पराभव झालेल्या मुंबईने अखेर मंगळवारी पंजाब संघाला पराभूत करत विजयी पुनरागमन केले. मधल्या फळीतील एडन मार्क्रम याच्या ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने २० षटकात १३५ धावा केल्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरूवात खराब झाली होती. पण कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या या दोघांनी योग्य वेळी फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून दिला. एकाच षटकात कायरन पोलार्डने फॉर्मात असलेल्या केएल राहुलला आणि धोकादायक ख्रिस गेलला बाद करून सामना फिरवला. फलंदाजीतही त्याने १५ धावा केल्या. त्यामुळेच त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. या गौरवारनंतर पोलार्डने एक महत्त्वाचे विधान केले.
"टी२० क्रिकेटमध्ये ३०० धावांचा टप्पा गाठणे ही बाब खूपच गौरवास्पद आहे. माझ्या गोलंदाजीचा फारसा विचार केला जात नाही. पण जेव्हा मला गोलंदाजीची संधी मिळते, तेव्हा मी माझी सर्वोत्तम कामगिरी करतो. पहिल्या षटकात मी दोन बळी टिपल्यानंतर अजून एखादी ओव्हर मला रोहितकडून नक्कीच मिळाली असती. पण काही वेळा तुम्ही सर्वोत्तम कामगिरी केलेली असताना थांबणं महत्त्वाचं असतं. माध्या गोलंदाजीला धार नाही. पण माझ्याकडे डोकं आहे. मी माझी अक्कल वापरतो आणि गरजेच्या वेळी विकेट काढतो", असं स्मार्ट उत्तर पोलार्डने दिलं.
"वेगवेगळ्या सामन्यांमध्ये खेळपट्टी आणि फलंदाजांचा ट्रेंड बघून गोलंदाजी दिली जाते. माझ्या गोलंदाजीमध्ये वेग नसेल, स्विंग किंवा स्पिनही नसेल. पण मी गोलंदाजी करताना डोक्याचा वापर करतो आणि मला दिलेलं काम तडीस नेतो. फलंदाजीतही तसाच प्रकार आहे. जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता तेव्हा सीमारेषा १५० मीटर लांब असल्यासारखं वाटतं. पण सरावानेच सगळं काही नीट होतं. आमच्या संघाला दोन गुण मिळवून देणं महत्त्वाचं होतं. ते मी आणि इतर खेळाडूंनी केलं", असंही पोलार्डने स्पष्ट केलं.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.