Sanju Samson, Player of the Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत (IPL 2024) चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघात रविवारी (24 मार्च) पार पडला. जयपूरला झालेल्या या सामन्यात राजस्थानने 20 धावांनी विजय मिळवला.
राजस्थानच्या या विजयात कर्णधार संजू सॅमसनने मोलाचा वाटा उचलला, त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरविण्यात आले. दरम्यान, त्याने सामन्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेने मात्र क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले आहे.
या सामन्यात संजू सॅमसनने 52 चेंडूत 82 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 193 धावा उभारल्या होत्या.
या सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर सॅमसनने विजयासाठी संदीप शर्माच्या गोलंदाजीलाही श्रेय दिले, तसेच त्याने म्हटले की ही सामनावीराची ट्रॉफी त्याला द्यायला हवी.
सॅमसन म्हणाला, 'मैदानात जाऊन धावा केल्याने नेहमीच चांगले वाटतं आणि त्यातही सामना जिंकला, तर अजून मस्त वाटतं. यावेळी मला एक वेगळी भूमिका मिळालेली आहे, कारण आमच्या संघाचे कॉम्बिनेशन थोडं यावेळी वेगळं आहे. संगकाराने (प्रशिक्षक) मला काही सल्ले दिले होते.'
'मी आता 10 वर्षे झाले आयपीएल खेळत आहे, त्यामुळे अनुभवही आला आहे. मला वाटतं परिस्थती समजून घेण्यासाठी काही वेळ लागतो. वनडे खेळल्याचा मला फायदा झाला आहे. तुम्ही तुमची ताकद आणि कमजोरी लक्षात घ्यायला हवी. मी असा फलंदाज आहे, जो केवळ येणाऱ्या चेंडूवर प्रतिक्रिया देतो, मग तो चेंडू पहिला असो किंवा शेवटचा.'
तसेच सॅमसन म्हणाला, 'मी ही ट्रॉफी संदीपला द्यायला हवी. जर त्याने ती तीन षटके टाकली नसती, तर मी सामनावीर झालो नसतो. मला असं वाटलं की मी त्याला बोलवायला हवं.'
'ऍश भाईचं बोलणं मी ऐकलं की फक्त कौशल्य नाही, तर दबावाच्या परिस्थितीत तुमची वागणूकही महत्त्वाची असते. त्याच्या डोळ्यात जिद्द दिसते आणि त्याची देहबोलीही सांगून जाते की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता.'
संदीप शर्माने या सामन्यात 3 षटके गोलंदाजी करताना 22 धावा देत 1 विकेट घेतली होती. सॅमसनने या सामन्यात 15 व्या षटकात संदीपला पहिल्यांदा गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला होता. त्यावेळी त्याने केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या.
लखनौला शेवटच्या 5 षटकात 60 धावांची गरज होती. त्यावेळी लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि निकोलस पूरन फलंदाजी करत होते. त्यावेळी 17 व्या षटकातही संदीपने गोलंदाजी करताना अवघ्या 7 धावा दिल्या आणि केएल राहुलची (58) विकेटही घेतली.
तसेच 19 व्या षटकात त्याने 11 धावाच दिल्या. त्यामुळे विजय राजस्थानच्या आवाक्यात आला होता. अखेरच्या षटकात आवेश खानने 6 धावा देत राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लखनौचा संघ 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 20 षटकात 6 बाद 173 धावा करता आल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.