
भारतीय संघाच्या पराभवाला बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये झालेल्या चुका कारणीभूत ठरल्या.
SA vs IND : टीम इंडियाच्या पराभवामागची पाच प्रमुख कारण...
South Africa vs India, 1st ODI : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावलेल्या टीम इंडियाची वनडे मालिकेची सुरुवातही खराब झाली. पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असून तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया आता 0-1 अशा पिछाडीवर आहे. भारतीय संघाने गोलंदाजीत सुरुवातीला आफ्रिकनं फलंदाजांच्या धावांवर अंकूश ठेवण्यात यश मिळवलं. पण सुरुवातीला धक्के देऊनही टीम इंडियाला शेवटी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाच्या पराभवाला बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये झालेल्या चुका कारणीभूत ठरल्या. जाणून घेऊयात टीम इंडियाच्या पराभवामागची पाच प्रमुख कारण....
चांगल्या सुरुवातीनंतरही गोलंदाजांना भागीदारी फोडण्यात आलेलं अपयश
भारतीय संघाने (Team India) पहिल्यांदा गोलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. मलान, डिकॉक आणि मार्करम स्वस्तात माघारी परतले. पण टेम्बा बवुमा (Temba Bavuma) आणि व्हॅन डर दुसेन ( Rassie van der Dussen) ही जोडी फोडण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना अपयश आले. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलणारी होती.
हेही वाचा: पाकच्या घोळक्यात स्मृतीनं भारताचं नाव राखलं!
लोकेश राहुलचं अपयश
जवळपास तीनशे धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामी जोडीवर मोठी कामगिरी करण्याचा दबाव होता. लोकेश राहुल आणि शिखर धवन जोडीनं सुरुवातही चांगली केली. पण लोकेश राहुल बाद झाला आणि भारतीय संघाची गणित फिस्कटलं. लोकेश राहुल अवघ्या 12 धावा करुन चालता झाला. त्याच्या भात्यातून एकही चौकार किंवा षटकार आला नाही. इथंच कुठतरी टीम इंडियावर दबाव निर्माण झाला.
धवन-कोहलीनं सावरलं; पण...
लोकेश राहुल बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली. पण मोक्याच्या क्षणी सेट झालेला शिखर धवन बाद झाला. दुसऱ्या बाजूला अर्धशतकानंतर विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि भारतीय संघ दबावात आला.
हेही वाचा: RSA vs IND 1st ODI : शार्दुलची फिफ्टी; टीम इंडिया हारली!
पंतसह दोन अय्यरचा फ्लॉप शो!
धवन कोहली यांनी अर्धशतके करुन भारतीय संघाचा डाव सावरला होता. त्यानंतर व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर आणि पंत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. या तिघांच्या फ्लॉपशोमुळे भारतीय संघ बॅकफूटवर गेला. तिन्ही फलंदाजांमध्ये मोठी खेळी करुन डाव सावरण्याची क्षमता आहे. पण ते आपली क्षमता दाखवून देण्यात अपयशी ठरले. एका बाजूला शार्दुल ठाकूरनं नाबाद अर्धशतक केलं. पण दुसऱ्या बाजूनं विकेट पडत राहिल्या आणि भारतीय संघ पराभवाच्या खाईत जाऊन पडला.
एनिग्डी-शम्सी अन् फेहलुकवायो त्रिकुटाची कमाल
भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडण्यात आफ्रिकेच्या त्रिकूटांनी योग्य भूमिका बजावली. प्रमुख गोलंदाज असलेला रबाडा नॉर्तजेच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी प्रभावी वाटत नव्हती. पण एनिग्डी, शम्सी आणि फेहलुकवायो यांनी मोक्याच्या क्षणी ब्रेकथ्रू मिळवून देत भारतीय संघाला अडचणीत आणले. पार्ट टाईम बॉलिंगसाठी आलेल्या मार्करमनेही एक विकेट घेत त्यांना उत्तम साथ दिली. तर केशव महाराजने एक विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केलेली संयुक्त कामगिरी आफ्रिकेसाठी फायदेशीर ठरली.
Web Title: South Africa Vs India 1st Odi 5 Reason Behind Team India Loss First Odi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..