kirloskar Company : डबघाईला आलेल्या किर्लोस्कर कंपनीला छत्रपतींच्या तोफांनी तारले! नेमकं काय घडलं होतं?

राजर्षी शाहू महाराज का बरं म्हणाले असतील की, किर्लोस्कर शहाणा माणूस आहे!
kirloskar Company
kirloskar Company Esakal

kirloskar Company :

प्रसिद्ध उद्योगपती आणि किर्लोस्कर समुहाचे संस्थापक लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ मध्ये बेळगावमधल्या गुरुलाहूर या छोट्याश्या गावामध्ये झाला. बेळगावातच शिक्षण पूर्ण करून लक्ष्मणरावांनी छोटंसं सायकलचं दुकानही सुरू केलं.

सायकलच्या दुकानानंतर त्यांनी शेतीसाठी लागणारी उपकरणं तयार करण्यास सुरुवात केली. आधी तर शेतकऱ्यांनी त्यांच्या उपकरणांबद्दल शंका उपस्थित केली. हे पहिलं उपकरण विकण्यासाठी किर्लोस्करांना जवळपास दोन वर्षे लागली. किर्लोस्करांचा प्रवास हा १८८८ साली सुरू झाला.

kirloskar Company
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi : राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त शंभर सेकंदाची स्तब्ध राहून श्रद्धांजली

आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतःचा उद्योग आणि एक समुदाय निर्माण करण्याचं किर्लोस्करांचं स्वप्न होतं. त्यातूनच सांगलीतील पलूस तालुक्याच्या माळावर किर्लोस्करवाडी शहर उभं केलं. तत्कालिन औंध संस्थानाचे प्रशासक बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी फॅक्टरी आणि या शहराच्या स्थापनेसाठी लक्ष्मणराव किर्लोस्करांना जमीन दान केली. याच जमिनीवर आजही किर्लोस्कर ब्रदर्सची इमारत दिमाखात उभी आहे.

पण हा डोलारा काही एका दिवसात उभारलेला नाही. त्याच्या मागे आहेत अनेक हातांचे कष्ट. या प्रवासात एक वेळ अशीही आली होती की, लक्ष्मणरावांना शेतीची अवजारे बनवण्यासाठी लोखंड अपुरं पडलं. तेव्हा त्यांच्या मदतीला दख्खनचे राजे राजर्षी शाहू महाराज धावून आले. कसे ते पाहुयात.

तो काळ पहिल्या महायुद्धाचा होता. महायुद्ध सुरू होऊन दोन वर्षे उलटली होती. युद्ध अजून किती वर्ष चालेल याची कोणालाच माहिती नव्हती. युद्धाने फक्त नुकसानच होते हेच खरे. कारण, त्या काळात युद्धाचा विदेशातील आयात-निर्यातीवर मोठा परिणाम झाला होता. जगभरातील सगळ्याच देशांच्या प्रगतीवरही याच परिणाम झाला होता. (Kirloskar Company )

kirloskar Company
माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोतर जयंती महोत्सवाचे आयोजन

देशातील अनेक कारखाने या काळात बंद पडण्याच्या मार्गावर होते. कारण, कारखान्यांसाठी लागणारा कच्चा माल इंग्लंडवरून आयात करावा लागत होता. अन् या युद्धामुळे ही आयात थांबली होती. परिणामी लक्ष्मणरावांच्या पुढेही कच्चा माल कुठून निर्माण करायचा हा मोठा प्रश्न होता.

अवजारांसाठी लोखंड मिळालं नाही तर कारखाना बंद करावा लागणार होता. अन् कारखाना बंद ठेवला तर मजूर बेकार होऊन त्यांचे जगणे मुश्किल होणार होते. किर्लोस्कर कंपनीची परिस्थिती बिकट होत चालली होती. त्यामुळे अवजारांसाठी लोखंड कुठून मिळवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता.

त्यावर तोडगा म्हणून लक्ष्मणरावांनी एक युक्ती केली. पुण्याचे व्यापारी राजाभाई आदमजी यांच्याकडून जुनी बिडाची मोड स्क्रॅप मागवली. त्यापासून नांगर बनवला. पण त्यासाठी लागणार रंगही परदेशातून मागवायला लागणार होता. त्यावरही लक्ष्मणरावांनी तोडगा काढला. उत्तर भारतातून काव मागवली आणि जवसाच्या तेलात बुडवून नांगराला फासली. ज्यामुळे रंगाचाही प्रश्न सुटला.

kirloskar Company
राजर्षी शाहू महाराज चित्ररथ अनावरण बातमी

अशा तडजोडी करून लक्ष्मणरावांनी कारखाना सुरू ठेवला. पण आताही अडचणी आल्या जेव्हा स्क्रॅपचा तुटवडा भासू लागला. तेव्हा असेच विचारात मग्न असताना त्यांना एक कल्पना सुचली.

कोल्हापूर संस्थानातील किल्ल्यांवर अनेक लोखंडी जुन्या तोफा धुळ खात पडल्या होत्या. त्या मिळाल्या तर आपल्या समोरील अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटतील, असे त्यांना वाटले. पण हा विचार आमलात कसा आणायचा. त्यावेळी कोल्हापुरच्या टेक्निकल स्कूलचे सुपरिटेंडेंट एस. व्ही. काटे यांच्याशी शंकररावांचा स्नेह होता.

या स्नेहाचा लाभ घेण्यासाठी शंकरराव कोल्हापूरला आले. काटेंची भेट घेतली व त्यांना अडचण सांगितली. श्रीमंत बापूसाहेब महारांज कागलकर यांना भेटण्यासाठी सर्वजण गेले. बापूसाहेब महाराजांना शंकररावांची कल्पना मान्य झाली व सर्वजन आता राजर्षी शाहू महाराजांना यांना भेटण्यासाठी नव्या राजवाड्यावर आले.

kirloskar Company
Shashitai Kirloskar : शशिताई किर्लोस्कर यांचे निधन

"किर्लोस्करांकडची माणसे आली आहेत." बापूसाहेब महाराजांनी महाराजांना परिचय करून दिला.

"काय काम काढलंय?” महाराजांनी प्रतिप्रश्न केला.

"त्यांना आपल्या किल्ल्यावरील तोफा हव्या आहेत."

"त्या आणि कशासाठी?" शंकररावांकडे पाहतच महाराज उद्‌गारले!

अस्सं होय...! शेतकऱ्यांच्या उपयोगी जर त्या तोफा पडत असतील तर त्यांना द्या...! किर्लोस्कर शहाणा माणूस आहे."

kirloskar Company
Lakshmanrao Kirloskar : सायकलचं दुकान ते कोट्यवधींची उलाढाल; लक्ष्मणरावांचं आयुष्य म्हणजे मॅनेजमेंटचा कोर्सच!

महाराजांचे उद्‌गार ऐकून शंकररावांचे हृदय भरून गेले. राजा म्हणून राजेपणाचे जीवन न जगता या राजाने आपले राजेपण केवळ जनतेच्या हितकल्याण-सुखासाठीच वेचल्यामुळे या राजाला जनतेच्या अडचणी समजल्या व त्या उदार अंत:करणाणे सोडविल्या.

अशा या राजाने तोफांच्या बदल्यात आमच्याकडून एक दमडीदेखील घेतली नाही. या माझ्या राजाला माझा हजारो हजारो वेळा कुर्निसात, असे पुटपुटत शंकरराव राजवाड्यांतून बाहेर पडले.

संबंधित प्रसंग प्रा.नानासाहेब साळुंखे यांच्या शाहुंच्या आठवणी या पुस्तकातून घेतला आहे. तसेच हा प्रसंग मूळ लक्ष्मणरावांनी लिहिलेल्या ‘तोफांचे नांगर’ मधून घेण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com