कोरोनामुळे(Corona) अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. महामारीच्या संक्रमणामुळे परीक्षा न झाल्याने पहिली ते नवव्या वर्गांपर्यंतचे विद्यार्थी थेट वरच्या वर्गात ढकलल्या गेले. ना शिक्षकाची कसोटी लागली ना विद्यार्थ्याची(Student). मात्र, या प्रक्रियेत मुलांच्या हाती स्मार्टफोन(Smartphone) आला. ऑनलाइन वर्ग(Online class) सुरु झाले. वर्गात असले की शिक्षक लेखन व्यवस्थित आहे की नाही याकडे लक्ष देत होते. पण आता तसे शक्य नाही. परिणामी, मुलांमधील लेखन कौशल्याचा ऱ्हास होत असल्याचे दिसत आहे. लेखनाची आवडही कमी होत असून वाचनाची सवयही तुटण्याच्या मार्गावर आहे.
ऑनलाइन परीक्षांमुळे विद्यार्थी तणावमुक्त झाले. मोबाईलच्या स्क्रीनवर चिमुकली बोटं थुई...थुई नाचू लागल्यानंतर मुलांच्या लिखाणातील ‘स्मार्टपणा’ हरवला. लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेचा ऱ्हास होत असून थेट ‘सर्च’ करून आवश्यक तेवढाच भाग स्वीकारण्याची सवय लागत असल्याने लागल्याने पुस्तक वाचनापासून मुले दुरावत आहेत. हे सर्व प्रकार म्हणजे भविष्यात मुलांचा मोबाईल सिंड्रोमच्या दिशेने प्रवास सुरू झाला असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही आणि याचे दुष्परिणाम पुढील दहा वर्षांत दिसतील.
कोरोनापूर्वी परीक्षेची तारीख जवळ येत असताना पोटात भीतीने गोळा येत होता. विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही परीक्षा सुरू असल्याचे दृश्य दिसायचे. पण परीक्षांमध्ये चांगले गुण मिळताच सारा तणाव दूर पळून जात होता. पण ऑनलाइन परीक्षापद्धतीमुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही बिनधास्त झाले.
काही मुले प्रामाणिकपणे अभ्यास करतात पण गैरफायदा घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळले. दहापैकी पाच मुलांवर ऑनलाइन शिक्षणाचा विपरित परिणाम होतो. वर्ग सुरू असताना मोबाईलमध्ये मल्टिपल साईटस् कधी ओपन होतील हे सांगता येत नाही. परिणामी पालकांची जबाबदारी वाढली आहे, असे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. मंजुषा गिरी यांनी म्हटले आहे. ‘
नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी’ प्रकल्पांतर्गत ‘डायरेक्ट टू होम’ वाहिन्यांचा समूह आहे. याचे प्रक्षेपण दिवसभरात रोज चार तासांच्या अंतराने दाखवण्यात येते. विद्यार्थी आपल्या सोयीच्या वेळेनुसार हे पाहू शकतात.शालेय शिक्षणाचाही यात समावेश आहे, मात्र, गावखेड्यात इंटरनेट सेवेच्या मर्यादा लक्षात पाहता शहरापुरते मर्यादित आहेत.
पालकांसाठी आवश्यक...
-मुलांवर दबाव टाकणे टाळावे
-इतर मुलांशी तुलना करु नका
-मुलाची आवड जपावी
-मुलांना केवळ नियमांच्या चौकटीत बांधून ठेवू नका.
-क्षमतांचा विचार करीत त्याला प्रोत्साहित करा
-परीक्षा ऑनलाईन असो की, ऑफलाईन मुलांसोबत राहा.
-मुले तणावात येताच त्यांच्याशी मनमोकळी चर्चा करा
-मुलाच्या वर्तनाकडे, त्यांच्या मानसिक बदलाकडे लक्ष द्या.
मोबाईलमुळे भविष्यातील धोके
- एकाग्रतेचा भंग
- डोळ्यांवर परिमाण
- कमी ऐकू येणे
- कानातून आवाज निघणे
- कान दुखणे
- लक्षात न राहणे
- चिडचिड करणे
- व्यायामाकडे दुर्लक्ष
- डी जीवनसत्त्वाचा अभाव
"ऑनलाइन परीक्षांमुळे मुलांपासून पुस्तक दुरावले. मुलांना स्क्रीनवरूनच शिक्षणाची सवय जडत आहे. स्क्रीन टाईम वाढल्याने ‘झोपे’ चे गणित बिघडले. यातूनच मोबाईल सिंड्रोमच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे."
- डॉ. मंजुषा गिरी, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ, नागपूर.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.