Rahul Gandhi : महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि इव्हीएम अशी विषयपत्रिका जाहीर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समाप्तीच्या निमित्ताने येथील शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत लोकसभा निवडणुकीची विषयपत्रिकाच जाहीर करण्यात आली.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal

- विजय चोरमारे

मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समाप्तीच्या निमित्ताने येथील शिवाजी पार्कवर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत लोकसभा निवडणुकीची विषयपत्रिकाच जाहीर करण्यात आली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि ईव्हीएम अशी ही विषयपत्रिका असून या चार मुद्यांचा बहुतेक नेत्यांनी उल्लेख करून याच मुद्यांवर विरोधी आघाडी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले.

नीतिश कुमार यांचा ‘जेडीयू’, जयंत चौधरी यांचा राष्ट्रीय लोकदल हे पक्ष इंडिया आघाडीचा त्याग करून ‘एनडीए’मध्ये सामील झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने आधीच ‘एकला चलो’चा मार्ग अवलंबला आहे. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनीही केरळ, पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर वाटचाल सुरू केली आहे.

इंडिया आघाडीच्या यापूर्वी झालेल्या बैठकांमधील या प्रमुख पक्षांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवणारी होती. आजच्या सभेला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हेही उपस्थित नव्हते, मात्र त्यांची उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत आघाडी जाहीर झाली आहे.

असे असले तरी उपस्थित नेत्यांनी इंडिया आघाडीचा आवाज बुलंद करतानाच एकजूट कायम टिकवण्याचा निर्धार व्यक्त केला. मंचावरील वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांचा निर्देश करून राहुल गांधी यांनी, हा माझा, उद्धव ठाकरे किंवा स्टॅलिन यांचा आवाज नाही, तर देशभरातील सामान्य माणसाचा आवाज असल्याचे सांगितले.

आघाडीतील काही प्रमुख पक्ष गळाले असले तरी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती ही इंडिया आघाडीसाठी आणि विशेषतः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसाठी मोठी जमेची बाजू ठरली. मात्र त्यांनी भाजपविरुद्ध लढण्याचा निर्धार व्यक्त करताना, एकट्यानं लढू किंवा एकत्र लढू परंतु लढायला पाहिजे, असे सांगून आपल्या भूमिकेतील संदिग्धता कायम ठेवली.

दर वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार, महागाई कमी करण्याचे आश्वासन, शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन तसेच प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याच्या नरेंद्र मोदींच्या आश्वासनांचा उल्लेख करून बहुतेक नेत्यांनी केला. पीकविम्याचा लाभही ठराविक वर्गालाच मिळत असल्याची टीका करण्यात आली.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करून ईव्हीएम मशिन चोर असल्याचे म्हटले. प्रकाश आंबेडकर यांनीही ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करून या प्रश्नावर निवडणूक आयोगाला घेराव घालण्याची सूचना केली.

मशिनमधील मते आणि कागदावरील मते यात फरक आढळल्यास कागदावरील मते अंतिम मानावीत, असे कायदा म्हणतो. त्यासाठी आपण लढायला तयार आहोत का, असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांनीही राजाचा आत्मा ‘ईव्हीएम’मध्ये असल्याचे सांगितले. बेरोजगारीच्या मुद्याकडे लक्ष वेधताना, अग्निवीर योजनेमुळे देशातील तरुणांच्या स्वप्नांचा चक्काचूर केल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com