Barrister Nath Pai : कोणते नेहरू खरे? पंडितजींना विचारणारे बॅ. नाथ पै
बॅ. नाथ पै यांनी राजापूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व १९५७-१९६२ आणि १९६७ असे १० वर्ष केले.
- अभिजित हेगशेट्ये Email : abhijit.shriram@gmail.com
Lok Sabha Election : भारत या अफाट, विशाल लोकशाही देशातील कोकणच्या राजापूर मतदारसंघापासून (Rajapur Constituency) सुरू होणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या मतदारसंघाची चर्चा आणि वारसा हा आजवरच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीतील केंद्रबिंदू झालेला आहे.
राजापूर लोकसभा मतदारसंघ म्हटला की, बॅ. नाथ पै (Barrister Nath Pai) यांच्या विद्वत्ता आणि वैभवशाली परंपरा आणि वाटचालीच्या आठवणींचे प्रसंग विवेकवाद आणि आदर्शवादाच्या मूल्याधिष्ठता आणि नैतिक चौकटींची आठवण नव्या पिढीला सतत करून देत राहतात. देशातील लोकसभेचे या मतदारसंघातील खासदार मोरोपंत जोशी यांचा १९५७ मध्ये पराभव करत समाजवादी पक्षाचे उमेदवार आंतरराष्ट्रीय समाजवादी युवा परिषदेचे अध्यक्ष बॅ. नाथ पै बहुमताने निवडून आले.
स्वातंत्र्याच्या अत्यानंदी जल्लोषाचा तो काळ. देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) हे देशातील सर्वाधिक लाडके व्यक्तिमत्त्व. देशातील आणि जगातील तरुणाई नेहरू यांची प्रचंड फॅन होती. आपल्या तेजोमय कर्तृत्वाने, उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने लाखोंच्या सभेने सारा देशच जवाहरलालमय झाला होता. एक विलक्षण जनतेचे अफाट प्रेम लाभलेला आणि कृत्रिमतेचा लवलेश नसणारा, तुरुंग, आंदोलन आणि स्वातंत्र्य चळवळीतून महात्मा गांधी यांच्या वैचारिक अधिष्ठानातून तयार झालेला नेता अशी प्रतिमा.
त्यांच्यासमोर त्या वेळी तितक्याच वैचारिक प्रगल्भतेने बोलणारे एकमेव व्यक्तिमत्त्व होते, ते म्हणजे बॅ. नाथ पै. १९६० मध्ये केंद्र सरकारने बळाचा वापर करत बॅ. नाथ पै नेतृत्व करत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढला. हा संप एक सामाजिक बंडखोरी असल्याचा आक्षेप घेत नेहरूंनी याचा लोकसभेत समाचार घेतला होता. या वेळी लोकसभेत उत्तर देताना बॅ. नाथ पै यांनी नेहरू यांच्या आत्मचरित्रातील एका उताऱ्याचा संदर्भ देत थेट पंतप्रधानांना प्रश्न केला, कोणते नेहरू खरे? १९२६ ला इंग्लंडमधील कोळसा कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणारे की, स्वदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला विरोध करणारे? थेट पंतप्रधांनाना प्रश्न करणाऱ्या नाथ पैंना नेहरूंनी कधी काळ्या यादीत टाकलं नाही तर बॅ. नाथ पै यांचे लोकसभेत भाषण सुरू झाले की, नेहरू येऊन जाणीवपूर्वक सदनात बसत.
एका अतिउच्च लोकशाहीचा वारसा हा या मतदार संघाच्या आठवणीचा मोठा वसा आहे. बॅ. नाथ पै यांनी राजापूर मतदार संघाचे प्रतिनिधित्व १९५७-१९६२ आणि १९६७ असे १० वर्ष केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्व बॅ. नाथ पै करत होते. बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्रात समावेश व्हावा यासाठी त्यांनी आंदोलन उभारले, जेलमध्ये गेले. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये ते भीषण जखमी झाले. त्याचा त्यांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागला. २४ मे १९६१ मध्ये कोकणात प्रचंड वादळ झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो गावांतील घरे उद्ध्वस्त झाली. त्या वेळी बॅ. नाथ पै परदेशात होते. लोकांना छप्पर उभाणण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत जमवत पत्रे दिले. बॅ. नाथ पै यांची वाट पाहात लोक जमावाने थांबलेले असत.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने तर कोकण ते कारवार आणि महाराष्ट्राच्या गळ्यातील ते ताईत होते. याच काळात देवरूख येथे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा दौरा होता. न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. चव्हाणांना पाहण्यासाठी तोबा गर्दी जमली होती. इकडे देवरूखातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलला बॅ. नाथ पै यांची सभा होती. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उतरले आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या स्थळी गेले; मात्र तेथे फारच कमी उपस्थिती तर मैदानावर विमान पाहण्यासाठी जमलेली तमाम जनता बॅ. नाथ पै यांचे भाषण ऐकण्यासाठी आंबेडकर हॉलमध्ये जमलेली. असा नेता, असे लोक आणि असे त्यांचे नेत्यावरील विलक्षण प्रेम, हे या मतदार संघातील एक वैशिष्ट्य.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.