Kolhapur Lok Sabha : घटलेल्या मतदानाचा यंत्रणेला धसका; कोल्हापूरचा टक्का वाढविण्याचे आव्हान
पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत या वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन मतदान घटल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर : लोकसभा (Kolhapur Lok Sabha) निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उष्णतेच्या लाटेमुळे तुलनेत कमी मतदान झाले आहे. त्याचा धसका राजकीय नेत्यांसह जिल्हा प्रशासनानेही घेतल्याचे चित्र आहे. मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्हा नेहमीच राज्यात अग्रभागी राहिला आहे. हे स्थान कायम टिकविण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे, तर राजकीय पक्षांकडूनही आपल्या उमेदवाराला कमी मतदानाचा फटका बसू नये, यासाठी यंत्रणा कार्यरत केली आहे. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाचे (Hatkanangle Constituency) मतदान सात मे रोजी होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे गत लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे मतदान हे राज्यात अग्रस्थानी राहिले. हे स्थान टिकविण्यासह मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान राजकीय पक्षांच्या नेत्यांसह निवडणूक विभागासमोर आहे. कारण पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्का घटल्याचे दिसून आले. रणरणत्या उन्हाच्या तडाख्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर शामियाना, पिण्याचे पाणी, पंखे आणि इतर अनुषंगिक सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश जिल्हा निवडणूक विभागाला दिले आहेत. तसेच राज्यातील आरोग्य विभागाला ही आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, असे सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोग घेतेय हवामान खात्याकडून आढावा
एप्रिलअखेर व मे महिन्यात तापमानाचा पारा ४० अंशांवर जाऊन उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत या वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन मतदान घटल्याचे चित्र आहे. याची भारत निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. हवामान खात्याकडून दररोज आढावा घेतला जात आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागालाही सूचना दिल्या जात आहेत.
मतदान केंद्राशेजारील खोलीत बसण्याची मतदारांना सुविधा
मतदार जास्त वेळ रांगेत थांबून राहू नयेत, यासाठी मतदान केंद्राशेजारी एका खोलीची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मतदारांना बसवून टप्प्याटप्प्याने तीन जणांना मतदानासाठी मतदान केंद्रावर पाठविले जाणार आहे. त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. या उन्हाच्या तडाख्यात मतदारांना आरोग्याची समस्या होऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून ‘स्वीप’अंतर्गत निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामूहिक रांगोळी, महाविद्यालयांमध्ये शिबिरे असे विविध उपक्रम घेण्यात आले आहेत. त्याचबरोबर एक मे रोजी ‘स्वीप’च्या समितीमध्ये असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष, ग्रामसेवक, ज्येष्ठ नागरिक यांची बैठक होऊन त्यामध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आणखी काय करता येईल? याबाबत चर्चा होणार आहे.
-समाधान शेंडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.