नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर युतीचे काय?

uddhav thackeray narayan rane
uddhav thackeray narayan rane

पुणे : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लवकरच भाजपमध्ये विलीन होणार आहे. मात्र, त्याचा परिणाम होऊन भाजप-शिवसेना युती तुटणार का? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोकणात सध्या भाजपला स्थान नसल्याने राणे यांच्या साह्याने शिवसेनाचा गड मानला गेलेल्या कोकणात प्रवेश करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

लोकसभेत सोमय्या, विधानसभेत राणे
राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सातत्याने शिवसेनेवर विशेषतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने, शिवसेनेचा राणे यांना तीव्र विरोध आहे. राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर, त्यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्याचा भाजपचा प्रयत्न होता. तो शिवसेनेने युती तोडण्याचा इशारा देऊन, हाणून पाडला. राणे यांनी मंत्रिमंडळात घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही फारसे अनुकूल नव्हते, अशीही चर्चा त्यावेळी झाली होती. त्यामुळे, राणे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून जावे लागले. शिवसेनेवर विशेषतः ठाकरे कुटुंबावर केलेली टीका शिवसेनेला आवडत नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील ठाकरे कुटुंबावर सातत्याने टीका केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शिवसेने भाजपला त्यांचे तिकीट कापण्यास भाग पाडले. कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये असलेल्या एकूण 15 जागांपैकी सध्या भाजप व काँग्रेस यांच्याकडे प्रत्येकी एक जागा आहे. राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसची सध्याची एक जागाही कमी होते. राणे यांच्या साह्याने भाजपला कोकणात त्यांच्या पक्ष विस्ताराचा फायदा होऊ शकतो. सध्या भाजपकडे पनवेलची एकच जागा आहे. शिवसेनेकडे 15 पैकी सात जागा असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव व अवधूत तटकरे या दोघांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.

राणेंमुळे शिवसेना युती तोडणार?
नारायण राणे यांना भाजपने प्रवेश दिल्याच्या कारणावरून शिवसेना येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपसमवेत होणारी युती तोडणार का? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. मात्र, कोकणातील शिवसेनेचे वर्चस्व लक्षात घेता, या कारणावरून युती तुटण्याची शक्यता तुलनेने खूपच कमी आहे. मुळात, भाजपने लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळविल्यानंतर, देशातील सर्वच राजकीय पक्षांना हादरा बसला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपसमवेत युती झाल्यामुळे, शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. त्यातच विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेशी युती करूनच निवडणूक लढविण्याचे भाजपचे नेते जाहीरपणे सांगत आहे.

युतीसमोर कोणता तिढा?
शिवसेना-भाजपची युती होण्यामध्ये मुख्य अडथळा आहे, तो जागा वाटपाचा. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या वाटाघाटीत दोन्ही पक्षांना समसमान जागा देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे अन्य मित्रपक्षांना 18 जागा सोडून, उर्वरीत जागा भाजप व शिवसेनेने प्रत्येकी 135 प्रमाणे घ्याव्यात, असा शिवसेनेचा प्रस्ताव आहे. भाजप मात्र, 110 ते 115 जागा शिवसेनेसाठी सोडण्यास तयार आहे. ही चर्चा घटस्थापनेपर्यंत सुरूच राहील. युती झाल्यास, शिवसेना 120 ते 125 जागेवर तडजोड करण्याची शक्यता आहे. राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश न केल्यास, त्यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार शिवसेनेच्या आठ-दहा जागांवर उभे राहतील. त्यापेक्षा ते भाजपमध्ये गेल्यास, त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांच्यासाठी केवळ एक जागा सोडल्यास, अन्य मतदारसंघांत शिवसेनेला त्रास होणार नाही. नितेश राणे 2014 मध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. तेथे भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे, शिवसेना राणे यांच्या प्रवेशाचा मुद्दा फारसा वादाचा करणार नाही. जागा वाटपातील वादामुळे युती तुटल्यास, मात्र शिवसेनेचे नेते अन्य कारणांबरोबरच राणे यांचाही मुद्दा युती तुटण्याच्या कारणांसोबत जोडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com