मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांचा फोन बंद होता. पण, आज, सकाळी त्यांची आणि शरद पवार यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची कोणतिही माहिती आपल्याला दिली नव्हती, असे शरद पवार यांनी कालच स्पष्ट केले होते. अजित पवार यांचा फोन बंद होता. त्यामुळे त्यांचा कोणाशीच संपर्क होऊ शकला नाही. त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेण्यापूर्वी मुलगा पार्थ याच्याशी चर्चा केली होती. ‘राजकारण अतिशय गलिच्छ झाले आहे. तूही राजकारण करू नको, आपण शेती करू,’ असा सल्ला अजित पवार यांनी पार्थ यांना दिला होता. हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी शरद पवार यांच्याशी कोणतिही चर्चा केली नव्हती. त्यामुळे आता या निर्णयावर अंतिम निर्णय घेण्याची वेळ आल्याचे शरद पवार यांनी सांगितल्याचे समजते. त्यामुळेच शरद पवार यांनी अजित पवार यांना अल्टिमेटम दिला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत आपला अंतिम निर्णय कळवा, असा मेसेज शरद पवार यांनी अजित पवार यांना दिल्याची माहिती आहे.
अजित पवार मुंबईतच?
अजित पवार यांनी राजीनामा दिला असला तरी, तो विषय बाजूला ठेवत शरद पवार यांनी आज, मुंबईत पक्षाच्या नेत्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याबैठकांना अर्थातच अजित पवार उपस्थित नाहीत. पण, अजित पवार मुंबईतच असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. त्यामुळेच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सोनिया गांधींशी चर्चा
दरम्यान, शरद पवार व सोनिया गांधी यांच्यात सुमारे पंधरा मिनिटे फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. आज सकाळी दोन्ही नेत्यांची चर्चा झाली आहे.शरद पवारांनी ईडी च्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेला, सोनिया गांधींनी पाठिंबा दिल्याची माहिती आहे. तसेच अजित पवार यांच्या राजीनाम्या संदर्भातही सोनिया गांधी यांनी शरद पवार यांच्याकडे चौकशी केली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.