
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील हवामानात बदल झाले. डिसेंबर महिन्यातील ऐन थंडीमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले तर अनेक ठीकाणी पावसाने हजेरी लावल्याचं सुध्दा पाहायला मिळालं.
अकोला: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील हवामानात बदल झाले. डिसेंबर महिन्यातील ऐन थंडीमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले तर अनेक ठीकाणी पावसाने हजेरी लावल्याचं सुध्दा पाहायला मिळालं.
पश्चिम किनारपट्टीवरील अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र अजुनही कायम असल्यामुळे राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजही संपूर्ण ढगाळ वातावरण असणार आहे. थंड वारे आणि मधूनच पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. यामुळे हवेतील गारवा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्राच्या पश्चिम भाग, महाराष्ट्राची किनारपट्टी आणि मध्यप्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहेच. पण यातच या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता कमी होऊन कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश या दिशेने बाष्प पुढे सरकले आहे. यासोबतच बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रिवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दहा ते पंधरा दिवस थंडीत चढउतार राहणार असून किमान तापमान कमीअधिक स्वरूपात राहणार आहे.
या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता
वातावरणातील सततच्या बदलांमुळे आज राज्यभर पावसाची शक्यता आणि घनदाट धुकं पसरण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांना धोका असणार आहे.
वाहनधारकांनो सतर्क रहा
मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याची शक्यता असून वाहनचालकांसाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
ढगाळ हवामानाचा रब्बी पिकं आणि फळबागांना फटका
खरंतर, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कोकणासह नागपूर-विदर्भातही ढगाळ हवामान आहे. यामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. विदर्भात चणा, गहू, तूर, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. इतकंच नाही तर रब्बी पिकांवरही कीड- रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.
अनेक दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. गहू, हरभरा पिकांना जपावं असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे. त्याचा परिणाम कोकणात पहायला मिळतो आहे. रत्नागिरीत आज पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. सकाळच्या सुमारास आज तुरळक पावसाच्या सरी रत्नागिरीत पहायला मिळाल्या. यामुळे सगळ्यात मोठा फटका पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.
किडींचा प्रादुर्भाव वाढला, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी
सध्या ढगाळ वातावरणामुळे मराठवाड्यातही अनेक पिकांचं नुकसान झालं आहे. हरभरा, तूर, गहू, जोंधळा, करडी, सूर्यफूल या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाच्या झळा बसल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं आहे.