मुंबई : महाविकास आघाडीला जर, बहुमताची खात्री असले तर, त्यांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये डांबून का ठेवलंय? असा प्रश्न उपस्थित करत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला 'ओपन चॅलेंज' केले आहे. हिंमत असेल तर, गुप्त मतदान पद्धतीने विश्वास दर्शक ठराव घ्या, असं चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी बोलताना म्हटलंय.
सरकारने नियम बसवले धाब्यावर
गेल्या दोन दिवसांतील सरकारच्या निर्णयांवर बोट ठेवताना चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांचाच शपथविधी बेकायदा असल्याचा दावा केला. या संदर्भात राज्यपालांकडे याचिकाही दाखल होत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. पण, ही याचिका कोणी दाखल केली हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. चंद्रकांत पाटील म्हणाले, 'सरकारने नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केलीय. हंगामी अध्यक्ष बदलण्याचा निर्णय हे त्याचे उदाहरण आहे. अध्यक्ष बदलण्याचा आग्रह नव्या सरकारने घेतला. नव्या मुळात अध्यक्षांची निवड होऊपर्यंत राज्यपालांनी नेमलेलेच विधानसभा अध्यक्ष राहतात. हंगामी अध्यक्षांना अध्यक्षांचे सर्व अधिकाराला आहेत. पण, या सरकारने नियम धाब्यावर बसवला. आता आज विश्वास दर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्ष निवड उद्या, असं होणार आहे. विधानसभा कामकाजांचे नियम, संविधानाने केलेले कायदे त्याची पायमल्ली करायला सरकारने सुरुवात केली आहे.' सरकारला कोणतेही नियमबाह्य काम करू देणार नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
आणखी बातमी वाचा - विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोलेंचे नाव
ओपन चॅलेंज काय?
भाजपने मुरबाडचे आमदार किसन कथोरे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सरकारचा जर त्यांच्या बहुमतावर विश्वास असेल तर, गुप्त मतदान घ्या. आमचे तुम्हाला ओपन चॅलेंज आहे. जर, 170 प्लस बहुमत आहे तर, आमदारांना कोंडून का ठेवलंय? त्यांचे मोबाईल का काढून घेतलेत? कुटंबाशी संवाद साधला जात नाही. मारून मुटकून सरकार फार दिवस चालवता येत नाही. आम्ही प्रबळ विरोधीपक्ष म्हणून, काम करू.'
आणखी बातमी वाचा - विधानसभा अध्यक्ष निवडीत रंगत, भाजपनेही दिला उमेदवार
उद्धव ठाकरेंचा शपथविधी बेकायदा?
पाटील म्हणाले, 'मोठ्या मनाने उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. आम्ही व्यासपीठावर जाऊन त्यांचे अभिनंदन केले. पण, राज्यपालांनी अनेकदा सांगूनही चुकीच्या पद्धतीने शपथ घेण्यात आली. हा शपथविधी बेकायदेशीर आहे. श्रद्धास्थाने सगळ्यांची आहेत. आम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर आहे. पण, पदाची शपथ फॉर्मेटमध्येच घ्यावी लागते. यासंदर्भात राज्यपालांकडे याचिका दाखल होत आहे. शपथविधी बेकायदा ठरवावा, असं या याचिकेत म्हटलं. त्यांनी न्याय दिला नाही तर, सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल होऊ शकते.'
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.