राज्यात रक्ताचा तुटवडा

Blood Shortage
Blood Shortage

पेढ्यांची दमछाक; शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ
पुणे - दिवसभरात रक्तदानासाठी शंभर फोन केल्यानंतर दोन जणांनी रक्तदान केले. कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदात्यांनी रक्तदानाकडे पाठ फिरवली. तसेच, रक्तदान संयोजकांचाही रक्तपेढ्यांना प्रतिसाद मिळत नाही. यामुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहेत. तर तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी रक्त संकलित करताना रक्तपेढ्यांची दमछाक होत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसते. राज्यातील कोरोनाच्या उद्रेकाचा थेट परिणाम रक्तसंकलनावर होत आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताच्या मोजक्‍या बॅग शिल्लक आहेत.

ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रक्तदानाची व्यवस्था केली आहे; पण तेथे दिवसभरात एकही रक्तदाता फिरकला नाही. रक्तदान करण्याचे वारंवार आवाहन केले जात होते. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती येथील डॉक्‍टरांनी दिली.

‘थॅलेसेमियाच्या रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते. पुण्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्त मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी रक्तदाता बघावा लागतो. काही रुग्णांच्या नातेवाइकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागते. त्यातून दोन-तीन दिवस रक्त घेण्याची प्रक्रिया पुढे-मागे होते,’’ असे पुण्यातील थॅलसेमिया सोसायटीचे सदस्य जतीन सेजपाल यांनी दिली.

काही शस्त्रक्रिया होतात; पण रक्ताची गरज असणाऱ्या नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. काही शस्त्रक्रियांमध्ये रुग्णाच्या नातेवाइकांना संबंधित रक्तगटाचा रक्तदाता आणण्याची विनंती केली जाते. त्याशिवाय शस्त्रक्रिया किंवा उपचार करणे अवघड होते.
- डॉ. आनंद चाफेकर, रक्तपेढी प्रमुख, केईएम रुग्णालय 

कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. माहिती-तंत्रज्ञान कंपन्या सुरू असल्या तरीही त्यांचे बहुतांश काम घरातून होत आहे. औद्योगिक कारखान्यांमधूनही रक्तदान शिबिरे होत नाहीत. या सर्वांचा परिणाम रक्तसंकलनावर झाला आहे. रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठा कमी झाला आहे.
- डॉ. अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण

दिवाळीची सुटी आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीमुळे रक्तदाते रक्तदानासाठी पुढे येत नाहीत. प्रत्यक्षात अशा आव्हानात्मक काळात रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज आहे. सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्तदानाची प्रक्रिया सुरक्षित केली जाते. त्यामुळे तरुणांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची ही वेळ आहे.
- शंकर मुगावे, मुख्य समन्वयक, पुणे विभाग रक्तपेढ्या

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com