पुणे : कोरोना लस सक्तीची नसल्याचं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलंय. मात्र, काल पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी राज्यात कोरोना लसीचे दोन्ही डोस सक्तीची असल्याचे म्हटलं होतं. केंद्राला त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. मात्र राज्याला आपले निर्णय घेण्याचे अधिकार आहेत असे म्हणत त्यांनी लस सक्तीची असल्याचे सांगितले होते. त्यावरुन राज्य सरकारची याबद्दलची सक्तीची भूमिका आहे का? नेमकं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मात्र या सगळ्यावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलंय. अजित पवार म्हटल्याप्रमाणेच आम्ही दोन्ही लसी घेण्यासाठी लोकांना भाग पाडू मात्र राज्यात लसीची सक्ती नाही असे स्पष्टीकरण राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री टोपे म्हणाले, लसीकरण करा, हा विषय केंद्र सरकारनेच वारंवार सांगितला आहे. आपले राज्य यात कुठेही मागे नाही. पहिला डोस हा ९० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ही ६३ टक्क्यांच्या वर गेली आहे.
मात्र ज्यांची दुसऱ्या डोसची तारीख होवून गेली आहे आणि त्यांनी घेतला नाही ते लोक चुक करत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आम्ही त्यांना वारंवार सांगून विनंती करू आणि भाग पाडू, असेही टोपे म्हणाले. त्यावर लसीची सक्ती नाही का? असा सवाल त्यांना पुन्हा एकदा विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, लस सक्ती नाही, मात्र भाग पाडण्याचा अर्थ असा की दुसऱ्या डोससाठी आम्ही त्यांना समजावून सांगण्यात यशस्वी होवू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरा डोस घेण्यासाठी नामदार अजितदादा म्हटल्याप्रमाणेच प्रयत्न करु.
ज्या वर्गात विद्यार्थ्यी कोविड बाधित सापडेल तो वर्ग बंद ठेवण्यात येणार
उद्यापासून राज्यातील शाळा सुरु होत आहे. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षण आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पालकांनी विद्यार्थ्यांना निश्चिंतपणे शाळेत पाठवावे
लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मने एक सर्वेक्षण केलं असून या सर्वेक्षणात ६२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचे कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असे आवाहन देखील टोपे यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.