राज्याच्या वेशीवर दुष्काळ! ऑगस्टमध्ये ७१% पाऊस कमी; उपाययोजनांसाठी ८००० कोटी; शेतकऱ्यांना मिळणार मदत, वाचा सविस्तर...

सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. भीमा खोऱ्यातील २६ धरणांमध्ये सध्या १४८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे, पण पावसाचा भरोसा नसल्याने पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य दिले जात आहे.
Drought
Droughtsakal

सोलापूर : राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीच्या २९ टक्केच, तोही ठरावीक ठिकाणी झाला आहे. सद्य:स्थितीत ३२९ महसुली मंडळात पावसाचा २३ दिवसांचा खंड पडल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. भीमा खोऱ्यातील २६ धरणांमध्ये सध्या १४८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे, पण पावसाचा भरोसा नसल्याने पिण्याच्या पाण्यालाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला असून कोकण वगळता राज्यातील १८ जिल्ह्यातील खरीप वाया गेला आहे.

कोकण विभाग वगळता नाशिक, धुळे, नगर, सोलापूर, जळगाव, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलडाण, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाणी टंचाई काही गावांमध्ये निर्माण झाली असून शेतीला पाणी न मिळाल्याने पिके करपली आहेत.

कृषी विभागाकडून पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असून त्यानंतर कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडून पिकांची पाहणी होईल. शेवटी पावसाचा खंड व पिकांचे नुकसान, यावर आधारित एकूण संभाव्य नुकसानीच्या २५ टक्के रक्कम पिकविम्यातून शेतकऱ्यांना मिळेल. सप्टेंबरमध्येही पावसाने दडी मारल्यास ऑक्टोबरमध्ये दुष्काळी तालुके जाहीर होतील. तत्पूर्वी, राज्य सरकारने ‘एसडीआरएफ’मधून (राज्य आपत्ती निवारण निधी) आठ हजार कोटी रुपये उपाययोजनांसाठी तयार ठेवले आहेत.

बॅंकांचे पीक कर्जवाटप ठप्प...

कर्जमाफीतील दोन लाखांवरील थकबाकीदारांच्या बाबतीत राज्य सरकारने अजूनही काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बॅंकांची विशेषत: जिल्हा मध्यवर्ती बॅंकांची थकबाकी ‘जैसे थे’ आहे. कर्जवसुलीसाठी प्रयत्न होत असतानाच पावसाने ओढ दिल्याने वसुलीही ठप्प झाली आहे. दुसरीकडे आता पावसाअभावी पिकांनी माना टाकायला सुरवात केल्याने बॅंकांनी खरीप हंगामातील कर्जवाटप थांबविल्याची स्थिती आहे. खरीप हंगामात यंदा ७० हजार कोटींचे कर्जवाटप अपेक्षित होते, पण आतापर्यंत बॅंकांनी ५० ते ५४ हजार कोटींचेच कर्जवाटप केले आहे.

२६ धरणांमध्ये १४८ टीएमसी पाणी

धरण उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी

पिंपळगाव जोगे २.४८ टीएमसी ६३.७३

माणिक डोह ६.१६ टीएमसी ६०.४८

येडगाव ०.७६ टीएमसी ३९.३५

वडज १.१४ टीएमसी ९५.६८

डिंभे ११.४३ टीएमसी ९२.०१

घोड १.१६ टीएमसी २३.७०

विसापूर ०.०५ टीएमसी ५.३५

चिल्हेवाडी ०.६२ टीएमसी ७७.०३

कळमोडी १.५१ टीएमसी १००

चासकमान ७.५७ टीएमसी १००

भीमा आसखेड ६.६८ टीएमसी ८७.२०

वडीवळे १.०७ टीएमसी १००

आंद्रा २.८३ टीएमसी ९६.४९

पवना ८.५१ टीएमसी १००

कासारसाई ०.५७ टीएमसी ९८.८७

मुळशी १८.०२ टीएमसी ८९.५९

टेमघर २.८८ टीएमसी ७७.५८

वरसगाव १२.६९ टीएमसी ९७.९७

पानशेत १०.६५ टीएमसी १००

खडकवासला १.०७ टीएमसी ५४.३९

गुजवणी ३.१६ टीएमसी ८६.११

निरा देवधर ११.७३ टीएमसी १००

भाटघर २१.६८ टीएमसी ९१.४९

वीर ६.६८ टीएमसी ७०.९७

नाझरे ००० ०००

२० दिवसांत उजनीत केवळ एक टीएमसी पाणी

८ ऑगस्ट रोजी उजनीतील पाणीसाठा ६.२५ टीएमसीपर्यंत होता. त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने २७ ऑगस्टपर्यंत उजनी धरणात केवळ एक टीएमसी पाणी वाढले आहे. सध्या उजनीत ७.४२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी २७ ऑगस्ट रोजी उजनी धरण १०१ टक्के भरले होते. धरणात त्यावेळी ५४.११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा परिस्थिती चिंताजनक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com