महाराष्ट्राच्या राजकारणातील हे चार दिवस आणि आठ घटना

Devendra-and-Ajit
Devendra-and-Ajit

दिवस : पहिला : शनिवारी 23 नोव्हेंबर 2019 
घटना 1 : आघाडीला पहाटे पहाटेच धक्का 

शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कुठेही वाच्यता न करता भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकार स्थापन केल्याचे भासवले जाऊ लागले. मात्र काही वेळातच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांनी बंड केल्याचे जाहीर केले आणि राष्ट्रवादी पक्षाचा त्याच्याशी काहीच संबंध नसल्याचा खुलासा केला.

घटना 2 : कोर्टात प्रकरण पोचले 
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या पदधारणेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सदस्य संख्या नसताना राज्यपालांनी नव्या सरकारचा शपथविधी घेणे हा प्रकार बेकायदा असल्याचे आघाडीने कोर्टाला सांगितले. विशेष म्हणजे शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी तीन वकील दिले होते.

दिवस दुसरा : रविवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 
घटना 3 : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू.

ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, मनू सिंघवी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली. सर्वोच्च न्यायालयाने राजभवन, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. 

घटना 4 : अजित पवारांचे ट्‌विटर वॉर 
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मौन बाळगलेल्या अजित पवार यांनी शरद पवार हेच माझे नेते असून, मी राष्ट्रवादीतच आहे, असं ट्‌विट केलं. भाजप-राष्ट्रवादी सरकार मिळून चांगलं काम करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याला तातडीने शरद पवार यांनी उत्तर देत यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा काही संबंध नसून अजित पवार दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच भाजपसोबत जाण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

पुन्हा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद 
कोर्टात पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्तापेचावर जोरदार युक्तिवाद झाले. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे घोडेबाजाराचं प्रकरण नाही. इथे संपूर्ण पागाच रिकामा झाला असल्याचं सांगितलं. त्यावर पागा तर अजूनही आहे, घोडेस्वारच पळून गेल्याची कोटी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली. या सुनावणीनंतर कोर्टाने मंगळवारी निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलं. 

आमदारांची परेड 
आपल्याकडे बहुमत असतानाही आपल्यावर अन्याय करण्यात आल्याचं दाखविण्यासाठी महाआघाडीच्या नेत्यांनी मुंबईतील हॉटेल ग्रॅंड हयातमध्ये तिन्ही पक्षांच्या आमदारांची ओळख परेड घडवून आणली. राज्यपालांवर दबाव आणण्यासाठी हे दबावतंत्र घडवून आणण्यात आलं. या वेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारेही दिले. 

सर्वोच्च न्यायालयाचा झटका 
आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देताना फडणवीस सरकारला येत्या काही तासांत बहुमत सादर करण्याचे आदेश दिले. गुप्त मतदान करू नये आणि मतदानाचं थेट लाइव्ह प्रक्षेपण करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले. त्यामुळे फडणवीस सरकारसाठी हा मोठा धक्का होता. कोर्टाच्या निर्णयानंतर अजित पवार यांनी फडणवीस यांना भेटून त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्त केला. 

फडणवीस यांचाही राजीनामा 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीकास्त्र सोडत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामाही दिला. त्यामुळे सत्तानाट्यावर पडदा पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com