
राज्यातली कमी होणारी रुग्णसंख्या पाहून काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मास्कसक्तीचा नियम शिथिल केला होता. आता मास्क परिधान करणं हे ऐच्छिक असेल, अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर निर्बंधांबाबत राज्य सरकार फेरविचार करणार असल्याचे संकेत मिळत आहे.
राज्यात शिथिल करण्यात आलेला मास्कसक्तीचा नियम पुन्हा लागू होण्याची चिन्हं आता दिसू लागली आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. माध्यमांशी बोलताना आज राजेश टोपे म्हणाले की, जर कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होऊ लागली, तर मात्र मास्कसक्ती पुन्हा लागू करावी लागेल. लसीकरणाचा वेग वाढवणं आणि लहान मुलांच्या लसीकरणासाठी आवश्यक ते सर्व उपाय करणं हे आमचं लक्ष्य आहे.
राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याचे संकेतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. पुन्हा मास्क वापरायला सांगायचं की नाही, याबद्दलही चर्चा झाली. सध्या लोकांना मास्क वापरायचं आवाहन करत आहोत पण मास्क वापरणं ऐच्छिकच आहे. याबाबत टास्क फोर्स आणि तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. जर रुग्णसंख्येचं प्रमाण वाढत राहिलं आणि टास्क फोर्सनं सूचना दिल्या तर काही निर्बंध लागू करावे लागतील, असं अजित पवार म्हणाले आहेत.