महाराष्ट्रात माता मृत्यूदर झाला कमी; मिळवला देशातून दुसरा क्रमांक

mother mortality
mother mortality

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवत असताना राज्यासाठी सुखावणारी बातमी समोर आलीये. सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या (एसआरएस) गुरुवारी प्रकाशित झालेल्या अहवालातून मातामृत्यू दर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत यावेळेसही महाराष्ट्राने आपला दबदबा राखला आहे. 

राज्यात आरोग्य विभागामार्फत मातामृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्राने हे यश मिळवले आहे. केंद्रीय नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या 2016- 18 च्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या यादीत पहिल्या स्थानावर केरळ असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळचा मातामृत्यू दर 42 नोंदवला गेला आहे, तर महाराष्ट्राचा मातामृत्यू दर 46 आहे. 

तीन वर्षात मोठं यश 
गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राचा मातामृत्यू दर 68 वरून 61 नंतर 55 आणि आता 46 असा नोंदवण्यात आला आहे. या यादीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये केरळ (43), महाराष्ट्र (46), तामिळनाडू (60), तेलंगणा (63), आंध्रपदेश (74) या राज्यांचा समावेश आहे. या सर्वेनुसार देशाचा मातामृत्यू दर हा 113 असून 2015-17 च्या तुलनेत त्यात 7.4 टक्क्यांनी घट झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने माता मृत्यू दर कमी करण्यासाठी नेमून दिलेल्या शाश्वत विकास ध्येयाची पूर्तता देशातील पाच राज्यांनी केली असून त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

उपाययोजनांमुळे मातामृत्यू रोखण्यात सातत्य : आरोग्यमंत्री  राजेश टोपे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र देशात अग्रेसर असताना आज प्रकाशित झालेल्या एसआरएसच्या अहवालात माता मृत्यू दर कमी असलेल्या राज्यांच्या यादीत यावेळेसही महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवला, ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे. या क्षेत्रात राज्यातील आरोग्य यंत्रणा करत असलेल्या उपाययोजनांमुळे आणि प्रयत्नांमुळे हे यश असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. राज्यात संस्थात्मक बाळंतपणात वाढ झाली असून त्यामुळे मातामृत्यू रोखणे शक्य होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. 

संस्थात्मक बाळंतपणात वाढ
राज्यातील गर्भवती मातांच्या आणि नवजात अर्भकांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येत आहेत. राज्यात 248 प्राथमिक संदर्भ सेवा केंद्र (फर्स्ट रेफरल युनिट) सुरू करण्यात आले असून त्यामाध्यमातून संस्थात्मक बाळंतपण वाढवण्यावर भर दिला जात आहे. माहेर योजनेच्या माध्यमातूनही दुर्गम भागात मातामृत्यू रोखण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

----
संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com