
कोकण ते विदर्भ, असा आहे आपला महाराष्ट्र; जाणून घ्या खास गोष्टी
Maharashtra Din 2022: आज 1 मे... महाराष्ट्र दिन...1960 साली याच दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. अर्थात त्यासाठी अनेक लोकांनी मोठा संघर्ष केला, आंदोलनं केली, हौतात्म्य पत्करलं. आता महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे लोटली आहेत. अनेक चढउतार तसेच संकटांचा सामना करत महाराष्ट्रानं विकासाची कास धरली आणि आज देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून आपलं राज्य शीर्षस्थानी पोहोचलं आहे. आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला अभिमान नक्कीच आहे, परंतु हा महाराष्ट्र नेमका कसा आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग आज जाणून घेऊया महाराष्ट्राबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी...

विस्तार-
महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1660 रोजी झाली. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौकिमी असून क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची सीमा छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांशी तसेच दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशाशी लागून आहे. महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी-720 किमी तर पूर्व पश्चिम लांबी 800 किमी एवढी आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राला तब्बल 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे मासेमारी तसेच जलवाहतूक याबाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहे.

लोकसंख्या आणि मतदारसंघ-
लोकसंख्येच्या बाबतीत बोलायचं झाल्यास महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,330 एवढी आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून ती देशाची आर्थिक राजधानी आहे. तर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
विधानसभा मतदारसंघ- 288
विधानपरिषद मतदारसंघ- 78
लोकसभा मतदारसंघ- 48
राज्यसभा मतदारसंघ -19

महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
34 जिल्हा परिषद (मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही.)
तालुके 358
ग्रामपंचायती 27855
पंचायत समित्या 351
महानगरपालिका-27
नगरपरिषदा 236
नगरपंचायती-124
कटक मंडळे 7

महाराष्ट्र प्रशासकीयदृष्ट्या 6 विभागात विभागला आहे.
कोकण- पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
नाशिक- नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव
नागपूर- नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर
अमरावती- अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ,
औरंगाबाद- औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड

महाराष्ट्राची वैशिष्ट्ये-
महाराष्ट्राची भूमी बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे.
कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून (उंची 1664 मी.) आहे.
गोदावरी, कृष्णा, सावित्री, नर्मदा, पंचगंगा, कोयना ही महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत.
दख्खन पठारावर कापसाची काळी कसदार मृदा आढळते.
आंबोली जि.सिंधुदुर्ग, कोकण येथे राज्यातील सर्वाधिक पाऊस पडतो.
बुलढाणा जिल्हातील लोणार हे उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे. याशिवाय अजिंठा-वेरुळ लेणी, छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे गडकिल्ले, कास पठार, गेट वे ऑफ इंडिया, विविध व्याघ्रप्रकल्प, अष्टविनायक, ज्योतिर्लिंगे, शक्तीपीठं इत्यादी अनेक ठिकाणं पाहण्यासारखी आहे.
