
Navi Mumbai International Airport to boost connectivity and convenience for Pune travelers, reducing travel time and enhancing Maharashtra’s air network.
esakal
How Punekar Will get Benefit from Navi Mumbai Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या(बुधवार) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या विमानतळामुळे केवळ मुंबईकरांनाच नाहीतर पुणेकरांना आणि पश्चिम महाराष्ट्रालाही मोठा फायदा होणार आहे.
प्राप्त माहितीनुसार या विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये विविध लोककलांचे सादरीकरण, नृत्य, संगीत, पारंपारिक वाद्य वादन यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचेही सादरीकरणे होणार आहे. या सोहळ्यास अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीयमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदारांसह मोठ्यासंख्यने स्थानिकांची उपस्थिती राहणार आहे.
नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर पुणेकरांची मोठी सोय होणार आहे. कारण, या विमानतळामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढत्या प्रवाशांचा ताण कमी होण्यास मदत होईल. शिवाय, पुण्यातील प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवासाठी मुंबई विमानतळापेक्षा हे नवी मुंबई विमानतळ अधिक जवळ असणार आहे, त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
या विमानतळामुळे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांसाठी हवाई कनेक्टिव्हिटी वाढेल, ज्यामुळे प्रवाशांना सोयीचे पर्याय मिळतील. तसेच मुंबई आणि पुणे दरम्यानच्या 'मिसिंग लिंक' रोडसारख्या पायाभूत सुविधांमुळे पुणेकरांना नवीन विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी कमी वेळ लागेल आणि रस्ते, रेल्वे आणि जलमार्ग यांसारख्या मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीची सोय असल्यामुळे, पुणेकरांना विमानतळापर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल.
नवी मुंबई विमानतळाबाबत माहिती देताना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, या विमानतळाचा फायदा केवळ मुंबई किंवा नवी मुंबईकरांनाच नव्हे तर पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रालाही होणार आहे. या विमानतळामुळे नव्या आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीच्या, रोजगाराच्या आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील.
नवी मुंबई विमानतळाचे वर्णन मोहोळ यांनी ‘ग्लोबल गेटवे टू ग्रोथ’ असं केलंय. कारण, पुण्याच्या नागरिकांसह येथील उद्योग आणि पर्यटन क्षेत्रालाही या विमानतळामुळे जलदगतीने जागतिक स्तरावर पोहोचण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. याचबरोबर या विमानतळामुळे पुणे जिल्ह्यातील ऑटोमोबाईल, फार्मा इलेक्ट्रॉनिक्स आणि एग्री-प्रोसेसिंग उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उत्पादनांची निर्यात करणे सुलभ होणार आहे. कारण, या विमानतळावर उभारण्यात आलेले अत्याधुनिक मालवाहतूक टर्मिनल वर्षाला सुमारे ३.२ दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळण्यास सक्षम असणार आहे. अशीही माहिती केंद्रीयमंत्री मोहोळ यांनी दिली आहे.
तर, या विमानतळामुळे पुणे-मुंबई महानगर प्रदेशात नव्या औद्योगिक कॉरिडॉरचा विकास वेगाने होईल. तसेच, नवी मुंबई विमानतळ ठाणे, भिवंडी आणि जेएनपीटी बंदराच्या जवळ असल्यामुळे मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमार्गे पुण्याहून थेट अडीच ते तीन तासांत पोहोचता येणे शक्य होणार आहे. यामुळे हवाई मालवाहतुकीचा कालावधीही कमी होईल आणि निर्यात खर्चातही घट होणार आहे. अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.