शरद पवार यांनी नुकतीच सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती व त्यावरुन राज्यात मोठा गदारोळ सुरू झाला होता. त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या निवृत्तीच्या विरोधात होते. या सगळ्या गदारोळानंतर शरद पवार यांनी आपलं राजीनामा मागे घेतला आणि लवकरच पक्षाचा कार्याध्यक्ष नेमू असं जाहीर केलं.
अशाच घडामोडी वादविवाद शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाच्या नेमणुकीवेळी देखील झाले होते. काय झालं होतं नेमकं जाणून घेऊ.
उद्धव ठाकरे राजकारणात कसे आले अन् शिवसेनेचे कार्याध्यक्ष कसे बनले?
३० जानेवारी २००३ रोजी महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचं अधिवेशन होतं. यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण, अशी चर्चा सुरू होती. राज आणि उद्धव ठाकरे या दोघांची नावं समोर येत होती. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरेंच्या अनुपस्थितीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव कार्याध्यक्ष म्हणून पुढे केलं आणि सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला.
हा निर्णय होण्याआधी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते राज आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फारशी चर्चा करत नव्हते. दोन्ही भावांमध्ये संघटनेची वाटणी केली जाईल, उद्धव ठाकरेंना मुंबई आणि उपनगर दिलं जाईल, तर उर्वरित महाराष्ट्र राज ठाकरेंकडे असेल, असंही त्यावेळी वाटत होतं. मात्र तसं काही झालं नाही.
पुढे उद्धव ठाकरे सक्रीय राजकारणात आले, त्यांनी १९९७ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांपासून राजकारणात सहभाग घेतला. मात्र राज ठाकरे मागे पडले. त्यांना मुद्दाम विविध प्रकरणांमध्ये गोवल्याचा संशयही राज ठाकरेंनी व्यक्त केला होता. २००२ त्या मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी पुढे उद्धव ठाकरेंवर सोपवली. त्यानंतर पुढे राज ठाकरेंवर कायम अन्याय होत असल्याची, डावलल्याची भावना समोर येत गेली आणि अखेर राज ठाकरेंनी पक्ष सोडला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.